फोटो - सोशल मीडिया
मुंबई : राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती. यावेळी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार आहे. भाजपचे पाच उमेदवार होते त्यासाठी भाजपकडे संख्याबळ देखील कमी होते. काँग्रेसकडे अधिकचे मत उपलब्ध होते. विधान परिषदेचे काँग्रेसची मतं फुटली. त्यामुळे महाविकास आघाडीतील शरर पवार यांचा पाठिंबा असलेले जयंत पाटील पराभूत झाले. या पराभवानंतर जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे मत फुटले असल्याचा मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले शेकाप नेते जयंत पाटील?
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या पराभवाच्या नेमक्या कारणाचा विस्तार करुन सांगितला. तसेच शरद पवार यांची त्यांच्यामागे ताकद उभी असल्याचा दावा निवडणूकीपूर्वी केला जात होता. मात्र त्यांचे देखील मत फुटल्याचा दावा शेकाप नेते जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, “मी पराभवाचं आत्मचिंतन करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचं राजकारण आधी नव्हतं. थोडंफार इकडे-तिकडे व्हायचं. मी निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असं घडत असेल तर जनतेनं दोन्ही सभागृहं कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे”, असं ते म्हणाले.
पुढे त्यांनी राष्ट्रवादीचे मत फुटले असल्याचा दावा केला. जयंत पाटील म्हणाले, “मी राष्ट्रवादीच्या १२ मतांवर उभा होतो. त्यातलं एक मत फुटलं. आमचीही मतं फुटली. मला जर चार मतं मिळाली असती, तर दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत मी २५ ते ३० मतं आणखी घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं”, असं म्हणत शरद पवार गटाची पूर्ण १२ मतं आपल्याला मिळाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली दुनियेची मतं फुटली तर त्यांच्या एका मताचं काय घेऊन बसलात?” अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.