
१० पैकी ९ भारतीयांचे कोलेस्ट्रॉल खराब! आयसीएमआरच्या अहवालातून धक्कादायक निष्कर्ष समोर
आजची धावपळीची जीवनशैली, अयोग्य खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या अयोग्य सवयींमुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील धमन्यांचे हळूहळू नुकसान होते आणि हृदयविकाराचा झटका, पक्षाघात व इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका नवीन अभ्यासाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या अभ्यासानुसार, जवळपास १० पैकी ९ भारतीय प्रौढ (८७.३%) किमान एका प्रकारच्या असामान्य लिपिड (कोलेस्ट्रॉल किंवा चरबी) समस्येने ग्रस्त आहेत. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, यापैकी अनेक व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा लठ्ठपणा नाही, तरीही त्यांना हृदयविकाराचा धोका आहे.(फोटो सौजन्य – istock)
डिस्लिपिडेमिया ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरातील कोलेस्ट्रॉल किंवा रक्तातील चरबीची (लिपिड) पातळी सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी असते.हा अभ्यास आयसीएमआर-इंडिया सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून करण्यात आला, ज्यामध्ये २३,६६५ प्रौढांच्या लिपिड प्रोफाईलचे विश्लेषण करण्यात आले. संपूर्ण देशाचे वास्तववादी चित्र मिळावे यासाठी यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील लोकांचा समावेश होता.
या अभ्यासात असे दिसून आले आहे की भारतीयांमध्ये सर्वांत सामान्य समस्या म्हणजे एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल कमी असणे.अभ्यासानुसार, डिस्लिपिडेमियाचा सर्वाधिक धोका ३० ते ३९ वयोगटात आढळून आला आहे. याचा अर्थ असा की, केवळ वृद्धच नव्हे तर तरुण पिढीलाही या समस्येचा वाढता धोका आहे.