मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या (Mumbai) दिशेने कूच करणार आहेत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. या आंदोलनादरम्यान अंतरवली ते मुंबई (Antarwali Sarati to Mumbai) या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. तसेच काहीही झालं तरी 26 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
असा असणार मार्ग
20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात (बीड)
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम – रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम – (लोणावळा)
25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी (नवी मुंबई)
26 जानेवारी 7 वा मुक्काम – आझाद मैदान, आंदोलनस्थळी
प्रत्येक जिल्ह्यात गावच्या वेशीपर्यंत
प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा कार्यकर्त्यांसोबत चालायचे आहे. अंतरवलीमधून मी एकटा निघणार आहे. मग सोबत एक लाख असो की एक कोटी असो, ते पाहिले जाईल. रोज पायी बारावाजेपर्यंत चालायचे आहे. त्यानंतर मुक्काम करायचा आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे. आता सरकारला आता वेळ द्यायचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
पुण्यात एक कोटी मराठा येणार
पुण्यामध्ये मराठा समाज बांधवाचा आकडा एक करोड होणार आहे. आम्ही पुण्यात दोन दिवस थांबणार आहे. आम्हाला पुणे बघायचे आहे. पुण्यावरुन सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. मुंबईला जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे, असे आवाहन केले. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचे त्यांनी सांगितले