अलिबागकरांचा 'हा' प्रश्न लवकरच मार्गी, उदय सामंत यांनी दिली माहिती
अलिबाग शहर ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टिने दिवसेंदिवस महत्त्वाचे ठरत आहे. शहरामध्ये जिल्हा कार्यालयांसह तालुका स्तरावरील वेगवेगळी शासकिय कार्यालये आहेत. तसेच लहान मोठी उद्योग व्यवसाय असून महाविद्यालये आहेत. सध्या शहराची लोकसंख्या सुमारे वीस हजार आहे.तर नागरिकांना एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा होतो. परंतू शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकीकरणदेखील झपाट्याने वाढत आहे.
सध्या चालू पाणीपुरवठा योजना ही 1997 ची असून शहराच्या गरजेनुसार वाढीव पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. याचपार्श्वभूमीवर अलिबाग शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेता अलिबाग नगरपरिषदेमार्फत नगरोत्थान महाभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच अस्तित्वातील जलवाहिनीचे नूतनीकरण अशा रुपये ४९ कोटी ११ लाख रूपयांच्या कामांना लवकरच सुरूवात करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
अलिबाग शहरात काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अलिबागमध्ये टँकरने पाणीपुरवठा बंद होवून अलिबाग नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. अलिबाग येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नगरपरिषदेमार्फत नगरोत्थान महाभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच अस्तित्वातील जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी ४९ कोटी ११ लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.