Drowned
सातारा : नीरा नदीच्या (Nira River) पात्रात हातपाय धुण्यासाठी उतरलेल्या तरुणीचा तोल गेल्याने ती नदीपात्रात घसरून पडली. नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे ती वाहून गेली. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास हरतळी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत घडली.
तेजल उर्फ तेजू वरूण साळुंखे (वय २३ रा. वरुड तालुका खटाव, जिल्हा सातारा) असे नीरा नदी पात्रात वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वेळवंडी आणि नीरा नदीच्या संगमावर भाटघर धरण आहे. धनगरवाडी गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणारी तेजल साळुंखे ही कंपनीतील मित्र दिगंबर साळेकर (रा. निगुडघर, तालुका भोर) यांच्या समावेत फिरण्यासाठी आली होती. यावेळी नीरा नदीच्या पात्रात असणाऱ्या पावर हाऊसमधून पाणी सोडण्यात आले होते. एका पुलाजवळ नदीपत्रात तेजल साळुंखे हातपाय धुण्यासाठी उतरली. त्यावेळी पाय घसरून पाण्यात पडल्याने ती वाहून गेली.
घटनास्थळी असणारा तिचा मित्र दिगंबर साळेकर यांनी भोर पोलीस यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बोर आणि शिरवळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. मात्र, अंधार पडल्याने ती थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी महाबळेश्वर ट्रॅकर प्रतापगड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमने पुन्हा शोध मोहीम सुरू केली. दिवसभर नदीपात्राच्या तिन्ही टीमने शोध घेतला. परंतु, दुसऱ्या दिवशीही तरूणीचा पत्ता लागला नाही.