appasaheb dharmadhikari
मुंबई: नवी मुंबईतील खारघर परिसरात काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात भीषण दुर्घटना घडली होती. याठिकाणी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील श्री सेवकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी तब्बल 20 लाखांची गर्दी जमली होती. या श्री सेवकांना दुपारच्या रणरणत्या उन्हात बसावे लागलं. त्यामुळे त्यापैकी 14 जणांचा उष्माघाताने (Heat Stroke) आणि पाण्याच्या कमतरतेने मृ्त्यू झाला होता.( Kharghar Tragedy)
ही भीषण दुर्घटना सरकार, प्रशासन आणि अन्य यंत्रणांना खडबडून जागी करणारी ठरली होती. या दुर्घटनेमुळे शिंदे-फडणवीस सरकार आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. यानंतर राज्यभरात दिवसा आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी खबरदारी घेतली आहे. या सगळ्यातून धर्माधिकारी प्रतिष्ठानानेही एक महत्त्वाचा धडा घेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात आयोजित केलेल्या जाणाऱ्या समर्थ बैठकांबाबत काही बदल करण्यात आले आहेत.
श्री समर्थ बैठकीला मोठ्या प्रमाणात श्री सदस्य हे जातात. आठवड्यात एक दिवस आयोजित करण्यात येणारी ही बैठक साधारण अडीच तास असते. पुरूषांची बैठक ही साधारण संध्याकाळी 7.30 नंतर भरते. महिलांची बैठक ही सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरवली जाते. अनेक ठिकाणी बैठक ही सकाळी 10.30 आणि दुपारी 1.30 वाजता असते. पण महाराष्ट्र भूषण दुर्घटनेनंतर उष्माघाताचा मुद्दा ऐरणीवर आला. अशावेळी आधीच एका कार्यक्रमात उष्माघाताने झालेल्या अप्रिय घटनेची जाणीव ठेवून बैठकीची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, महिलांच्या दुपारच्या बैठका या रद्द करण्यात आल्या आहेत. आता फक्त सकाळी 7.5o ते 10 वाजेपर्यंतच या बैठका असणार आहेत.
समर्थ बैठकीबाबत सूचना
श्री सद्गुरू आज्ञेने श्री समर्थ महिला बैठक वेळेबाबत सूचना. वातावरणातील तापमान वाढीमुळे महाराष्ट्रातील सर्व श्री समर्थ महिला बैठक बुधवार 31 मे पासून बैठकीची वेळ बदलली आहे. येत्या बुधवारपासून सर्व महिला बैठकांची वेळ ही सकाळी 7.50 ते 10 वाजेपर्यंत असेल.
सकाळी 7.50 ते 8.00 : श्री मनाचे श्लोक
सकाळी 8.00 ते 8.45 : श्री मंगलाचरण
सकाळी 8.45 ते 10.00 : श्री वर्तमान समास