
फोटो सौजन्य: iStock
बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या जेऊर परिसरात शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वी घेतला होता. मात्र हा निर्णय केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. 28 जानेवारीपासून पुन्हा शेतकऱ्यांसाठी रात्रीची वीज सुरू करण्यात आल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून, तात्काळ दिवसा वीज उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी तालुक्यात बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. निंबळक, खारे कर्जुनेसह विविध गावांमध्ये पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडल्या होत्या. तसेच चिमुकल्यांवर बिबट्यांचा हल्ला झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना देखील समोर आली होती. मानववस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याने रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देणे अत्यंत धोकादायक बनले होते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय काही आठवड्यांतच मागे घेण्यात आल्याने “दिवसा वीज देण्याचा निर्णय फेल गेला,” असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
महावितरणकडून जेऊर परिसरातील शेतीसाठीचे वीज वेळापत्रक बदलण्यात आले असून, पुन्हा रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. “दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होते का? एखादी मोठी घटना घडण्याची वाट पाहिली जात आहे का?” असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, लसूण तसेच चारा पिकांना नियमित पाण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे अत्यावश्यक असताना रात्रीचा वीजपुरवठा केल्याने अडचणी वाढत आहेत. जरी सध्या बिबट्यांच्या हालचाली काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी परिसरात बिबटे नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे.
मागील महिन्यात शेतीसाठीचे वीज वेळापत्रक बदलून रात्रीची वीज सुरू करण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी अक्षय कर्डिले यांची भेट घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र अवघ्या पंधरा दिवसांतच हा निर्णय रद्द करून पुन्हा रात्रीची वीज देण्यात येत आहे. त्यामुळे महावितरणबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
“तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे…; ‘सक्षम २०२५-२६’ अभियानात काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वाया गेला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असतानाही वीज वेळापत्रकातील गोंधळामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.