मसाप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप(
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनेल आणि कृती समितींकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, साहित्य क्षेत्रात राजकीय पक्षांचा प्रवेश होतो आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२१ पासून मसाप निवडणुकीचे स्वरूप बिघडत चालल्याची खंतही साहित्य क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
परिवर्तन उत्कर्ष आघाडी पॅनलच्या वतीने शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे नाव आणि सरकारी यंत्रणेचा वापर राजेश पांडे हे साहित्य संवर्धन आघाडीच्या आडून करत असल्याचा आरोप विद्यमान कार्यकारिणीने केला. यावेळी परिवर्तन उत्कर्ष आघाडी पॅनल आणि राजेश पांडे यांच्यातील झूम बैठकीचा संवाद पत्रकार परिषदेत दाखवण्यात आल्याने सायबर सुरक्षेच्या नियमांचा भंग झाल्याचा सूरही सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सरकारी यंत्रणांचा वापर करून साहित्य संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संस्थांची स्वायत्तता अबाधित राहील, कोणताही सरकारी हस्तक्षेप होणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र संमेलनानंतर अवघ्या महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांचे नाव वापरून हस्तक्षेपाचे आरोप होत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करावी आणि साहित्य संस्थांपासून राजकीय हस्तक्षेप दूर ठेवण्याबाबत निस्पृह भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने खुलासा केल्याचा दाखला देत, तसाच खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद कृती समितीचे धनंजय कुलकर्णी यांनी विद्यमान कार्यकारिणीवर बेकायदेशीर सत्ता टिकवून ठेवण्याचा आरोप केला. पाच वर्षांपासून सदस्य नोंदणी बंद असतानाही काही निवडक व्यक्तींना सदस्य करून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच २००१ नंतरच्या निवडणूक घटनेस मान्यता नसणे, पुरस्कारांचे आमिष दाखवून साहित्यिकांवर दबाव टाकला जाणे, या मुद्द्यांवर त्यांनी टीका केली. परिवर्तन पॅनलच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी गेल्या दहा वर्षांत विद्यमान कार्यकारिणीने काय केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
विरोधी पॅनल समविचारी नसून पडद्यामागील शक्तींच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी केला. काही उमेदवार हे केवळ प्यादे असून साहित्य परिषदेची स्वायत्तता धोक्यात आणण्याचा कट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : ICC चे फटकारे तरीही पाकिस्तान बधला नाही! PCB प्रमुखाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले ‘सरकारच्या निर्देशांचे’
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी साहित्य संवर्धन आघाडीने आयोजित केलेल्या खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग करून ते प्रसारित केल्याप्रकरणी परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजेंद्र लखीचंद नन्नावरे (रा. जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीसाठी रेकॉर्डिंगची कोणतीही संमती देण्यात आली नव्हती. तरीही गुपचूप रेकॉर्डिंग करून त्याचा वापर पत्रकार परिषदेत बदनामीसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखा तांत्रिक चौकशी करत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अभिजात मराठी साहित्य संवर्धनावर चर्चा अपेक्षित आहे. मात्र विरोधक मुद्दाम राजकारण आणत उणीदुणी काढत आहेत. राजेश पांडे






