औरंगाबाद: रत्नागिरीतील (Ratnagiri) पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar) याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वारिसे मृत्यू प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे का? असा सवाल विचारत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
[read_also content=”बाबो ! आली रे आली जगातली सगळ्यात वेगवान कार, महिंद्राच्या GT Battista चा स्पीड आणि किंमत जाणून घ्या https://www.navarashtra.com/automobile/fastest-car-in-the-world-gt-battista-launched-in-hyderanad-nrsr-368951.html”]
औरंगाबादच्या पैठण दौऱ्यावर असताना अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा घटना सतत घडत आहे. हे सरकार आल्यापासून अशा घटना घडत आहे. मात्र असे भ्याड हल्ले कोणीही सहन करणार नाही. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, त्यानंतर प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आता तशाच पद्धतीने कोकणमधील एका पत्रकारावर हल्ला करून, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. यामागचा मास्टरमाईंड कोण आहे हे देखील समोर आले पाहिजे. अशा घटना घडत असताना सरकार आणि पोलीस काय करत आहेत, हे सर्वजण झोप काढतायत का? असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला आहे.
ते म्हणाले की, राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होत असती तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे पाहावे. कायदा सुव्यवस्था कशी कायम राहणार. त्यामुळे या घटनेचा तपास झालाच पाहिजे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडे काय माहिती आहे हे मला माहित नाही. पण कुणाला कोणी धमकावत असेल आणि सातत्याने असे घडणे हे सरकारचे अपयश आहे. महाविकास आघाडीला कोणती अडचण येईल असं वक्तव्य मी करणार नाही.
पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबद्दल अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोरी करण्यामागचा सूत्रधार दुसराच दिसतोय, मतांचे विभाजन करण्यासाठी हे सुरु आहे. आदित्य ठाकरे हे सोमवारी जाणार आहेत. सचिन अहिर बंडखोरी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार होते. उद्धव ठाकरे हे त्यांच्या मतदारांना आवाहन करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.