प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य
मुंबई: उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर, पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटक, भाविकांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अडकलेल्या पर्यटकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ आणि इतर जिल्ह्यातील ४० अशा एकूण ५१ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून पर्यटकांशी सतत संपर्क साधत आहे. उत्तराखंडच्या प्रशासनाशी सुद्धा राज्य शासन सातत्याने संपर्कात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व त्यांना महाराष्ट्रात लवकरात लवकर परत आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत,अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक :
1) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र
माहितीसाठी संपर्क: 93215 87143/ 022-22027990/022-22794229
2) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड
संपर्क 0135-2710334/8218867005
सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर
उत्तरकाशीमध्ये पुण्यातील मंचर भागात राहणारे सुमारे २४ नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या टॅग करत या पर्यटकांचा शोध घेण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, त्यांनी यातील काही पर्यटकांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांकही दिले आहेत.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीतील धराली येथे मंगळवारी (5 ऑगस्ट) झालेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण उत्तराखंडमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खीर गंगा नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले. या आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या महापुरात रस्ते, घरे, दुकाने, सर्वकाही पाण्यात वाहून गेले आहे, नदीच्या पाण्यात अनेक वाहनेही वाहून गेली आहेत.