
बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
अमरावती : अमरावती जिल्हाने देशव्यापी बालविवाहमुक्त भारत’ ऑनलाइन प्रतिज्ञा मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात टॉप २० मध्ये स्थान मिळवले आहे. आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रतिज्ञा घेत अमरावतीला राज्यात ७ वा क्रमांक मिळवून दिला असून, बालविवाहविरोधी लढ्यात जिल्ह्याचा सक्रिय सहभाग अधोरेखित झाला आहे जिल्ह्यातून आतापर्यंत ३८६९६, नागरिकांनी ‘मी बालविवाह करणार नाही…’ अशी ऑनलाइन प्रतिज्ञा घेतली असून, अमरावतीचा राज्यात ७ वा क्रमांक मिळविला. मात्र, राज्यात आघाडीवर असलेल्या अकोला ३९ हजार ८४४ आणि वाशिम १४ हजार ३८३ नागरिकांनी ही शपथ घेतली आहे.
२० नोव्हेंबरपासून ‘बालविवाहमुक्त भारत’ ची शपथ कार्यक्रम शासनाकडून राबविला जात आहे. यासाठी ८ मार्च ही शेवटची मुदत आहे. भारताला २०३० पर्यंत बालविवाहमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून, २०२६ पर्यंत देशातील बालविवाहाचे प्रमाण सध्याच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी करणे, हे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासनाकडून अंमबलजाणी केली जात आहे. केंद्र सरकारने बालविवाहमुक्त भारत अभियानांतर्गत संकेतस्थळ सुरू केले आहे. या पोर्टलवर जाऊन कोणताही नागरिक, विद्यार्थी किंवा सरकारी कर्मचारी ‘मी माझ्या कुटुंबात किंवा परिसरात बालविवाह होऊ देणार नाही आणि असा प्रकार आढळल्यास १०९८ किंवा प्रशासनाला कळवेन’, अशी ऑनलाइन शपथ घेऊ शकतो.
नागरिक, विद्यार्थ्यांनी सरकारी बालविवाह पोर्टलवर जाऊन कोणताही नागरिक, ‘मी माझ्या कुटुंबात किवा परिसरात बालविवाह होऊ देणार नाही, अशी शपथ घेऊन या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, अशी माहिती जिल्हा बालक संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी दिली.
नोव्हेंबरपासून राबविल्या जात असलेल्या या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट केवळ जनजागृती करणे नसून, नागरिकांना बालविवाहाविरुद्धच्या लढ्यात सक्रिय करणे हे आहे.
अकोला – ३९८४४
अमरावती – ३८६९६
बुलढाणा – २०६१७
यवतमाळ- १७७७४
वाशिम – १४३८