
मिरज पश्चिममध्ये लाळ्या आजाराचा उद्रेक; मौजे डिग्रज, कर्नाळ व पद्माळेत जनावरे मृत्युमुखी
सांगली : सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज, कर्नाळ व पद्माळे या तीन गावांमध्ये जनावरांमध्ये लाळ्या आजाराचा गंभीर उद्रेक झाला असून, उपचाराअभावी अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मोजे डिग्रज गावातच आतापर्यंत ७ ते ८ जनावरे लाळ्या आजारामुळे दगावली असून, उर्वरित गावांमध्येही मोठ्या प्रमाणात जनावरे बाधित झाली आहेत. या तीन गावांतील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक जनावरांना या आजाराची तीव्र लागण झाली आहे. आजारामुळे जनावरांच्या तोंडातून लाळ गळणे, पायांच्या खुरांचे नुकसान होणे अशी गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. ही तीनही गावे एका पशुवैद्यकीय विभागांतर्गत येतात. मात्र, या विभागात केवळ एकच डॉक्टर उपलब्ध असून, त्यांच्या पदोन्नतीनंतर अतिरिक्त जबाबदारी दुग्धशाळा विभागाकडे गेल्याने या गावांकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, वेळेवर उपचार न मिळाल्याने जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेदेखील वाचा : कराड नगरपालिकेत समित्यांची निवड बिनविरोध; पहिल्याच सभेत स्थायीसह विषय समित्यांवर शिक्कामोर्तब
या तीन गावांमध्ये सुमारे १२ ते १३ हजार जनावरे असून, त्यातून दररोज अंदाजे १४ ते १५ हजार लिटर दूध उत्पादन होते. या दूधविक्रीवर गावातील शेतकऱ्यांचे कुटुंब, शिक्षण व दैनंदिन खर्च अवलंबून आहेत. एका जनावराची सरासरी किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याने आर्थिक नुकसानही प्रचंड आहे.
लाळ्या आजाराने बाधित सर्व जनावरांचे लसीकरण करावे
“तातडीने अतिरिक्त पशुवैद्यकीय डॉक्टरांची नियुक्ती करून लाळ्या आजाराने बाधित सर्व जनावरांचे लसीकरण करावे. तसेच मृत जनावरांच्या मालकांना त्वरित योग्य ती नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा या प्रश्नावर स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
– सुनिल फराटे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.
हेदेखील वाचा : Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश