Kolhapur News : महाप्रसादातून सुमारे 800 जणांना विषबाधा; 187 जणांवर उपचार सुरु
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनाकवाडी येथे ग्रामदैवत श्री कल्याणताई मातेच्या यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्नातून सुमारे 800 जणांना विषबाधा झाली आहे. उलटी, मळमळ सुरू झाल्याने 187 रुग्णांना तत्काळ इचलकरंजी येथील आयजी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगणात आले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
संपूर्ण गावावरच प्रसंग ओढवल्याने रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे श्री कल्याणताई माता देवीची यात्रा भरते. मंगळवारी देवीचा महाप्रसाद होता. यावेळी गावातील प्रत्येक घरातील नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. संध्याकाळपर्यंत कोणलाच त्रास झाला नाही मात्र रात्रीनंतर अनेकांना उलटी, हगवण सुरू झाली. गावातील प्रत्येक घरात दोन-तीन जणांना मध्यरात्रीपासून रुग्णालयात हलविण्याचे काम सुरू झाले.
मध्यरात्री वाढला त्रास
सुरुवाताच्या काही तासात इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लहान मुलांसह महिला, पुरुष व वृद्ध अशा सुमारे 100 जणांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला. मध्यरात्रीनंतर हा आकडा वाढत गेला. बुधवार सायंकाळपर्यंत सुमारे जिल्ह्यातील विविध शासकीय तसेच खासगी रुग्णालयात सुमारे ८०० जणांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. बीपी शुगर व इतर व्याधी असणाऱ्या काही जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते.
लहान मुलांची प्रकृती स्थिर
काही लहान मुलांची प्रकृती सुरुवातीला गंभीर झाली होती. मात्र, त्यांच्यावरील धोका टळल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अद्याप या प्रकरणी चौकशी सुरू असून कोणावरही कारवाई करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्हा प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे. माजी राज्यमंत्री-आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे भाजपाचे पक्षप्रमुख विजय भोजे आणि पृथ्वीराज जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांची माहिती घेतली.