
मातीची गुणवत्ता व पिकांच्या वाढीवर परिणाम; पशुधनासाठीही धोका
या पाण्याचा वापर शेतीसाठी केल्यास पिकांवर विपरीत परिणाम होतो. मातीची गुणवत्ता खालावते, पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते. पशुधनासाठीही हे पाणी धोकादायक ठरू शकते. काही ठिकाणी जनावरांना पाणी पाजल्यानंतर आजाराची लक्षणे दिसल्याचा दावा ग्रामस्थानी केला आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून, तो थेट आरोग्य आणि अर्थकारणाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे.
दोषींवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत
नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाने केवळ पाहणी करून समाधान मानू नये, तर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सक्षम आहे का, त्याची नियमित तपासणी होते का, तसेच मलनिस्सारण प्रकल्प कार्यरत आहेत का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. दोषीवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही पुढे येत आहे.
नदीकाठच्या विहिरींतील पाण्यालाही दुर्गंधी
नदीकाठच्या विहिरीतील पाण्यालाही दुर्गंधी येऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विश्वास कांबळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, नदीकाठावरील औद्योगिक वसाहतींमधील रसायनयुक्त सांडपाणी तसेच शहरातील मलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता ओढे-नाल्यांद्वारे थेट पंचगंगा नदीत सोडले जात आहे. विशेषतः धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने नदीतील नैसर्गिक प्रवाह घटतो, अशा वेळी मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळल्याने प्रदूषणाची तीव्रता वाढते आणि नदीचे पाणी पूर्णतः दूषित होते.
शिरोळ तालुक्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे
नदीपात्रातील या परिस्थितीमुळे डासांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार, ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती आरोग्यतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची होत आहे मागणी
पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी मानली जाते. या नदीवर हजारो शेतकऱ्यांचे शेतीसाठी अवलंबित्व आहे. तसेच अनेक गावांचे पिण्याचे पाणीही अप्रत्यक्षपणे या नदीवर अवलंबून आहे. त्यामुळे नदीचे वाढते प्रदूषण हा केवळ स्थानिक प्रश्न नसून व्यापक पर्यावरणीय संकट ठरू शकतो. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलून पाण्याचे नमुने तपासावेत, प्रदूषणाचे स्रोत शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
प्रदूषण मंडळाने तातडीने पाण्याची तपासणी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा प्रदूषण कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विश्वास बालिघाटे यांनी दिला आहे.