
‘जातो माघारी पंढरीनाथा’ म्हणत वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू
पंढरपूर, (वा.) महिनाभर पायी वारी करीत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांनी आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभावात पार पाडल्यानंतर रविवारी द्वादशीला परतीचा प्रवास सुरू केला. ‘मनी विठ्ठल आणि मुखी जपनाम’ करीत पंढरपूरचा निरोप घेताना अनेक वारकऱ्यांचा कंठ दाटून आला होता. ‘पंढरीहूनि गावा जातां । खंती वाटे पंढरीनाथा ॥ आता बोळवीत यावे । आमुच्या गावा आम्हांसवें ॥१॥ सदगदित कंठ । फुटो पाहे हृदय ॥ निळा म्हणे पंढरीनाथा । चला गावा आमुच्या आतां ॥२॥’ ’ म्हणत भाविकांनी विठुरायाला निरोप दिला.
आषाढी यात्रेसाठी नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी असे चार दिवस पंढरपुरात मुक्काम केलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागेत पवित्र स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, मंदिर कळस दर्शन आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण करून आता घराकडे परतीची वाट धरली आहे. यंदाच्या आषाढी यात्रेसाठी शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले होते. यंदा पंढरपुरात ३५ लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती होती.
पंढरपूरमधील ६५ एकर येथील भक्तिसागर, रेल्वे मैदान तसेच उपनगरीय भागातील मोकळ्या जागांमध्ये वारकऱ्यांनी तंबू व राहुट्या उभारून मुक्काम केला होता. वाढलेल्या भाविकांच्या संख्येमुळे शहरात वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली होती. आषाढी सोहळ्यानंतर आता हळूहळू वारकऱ्यांची गर्दी कमी होत असून, शहरातील रस्त्यांवरून दिंड्या, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर करीत वारकरी आपल्या गावाकडे रवाना होत आहेत.
कोकणवासियांवर बाप्पा पावला! रेल्वे प्रशासन अतिरिक्त गाडया सोडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
एकादशीच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील अनेक भाविकांनी पंढरपूरचा निरोप घेतला होता, तर राज्याच्या विविध भागांतून आलेले वारकरी द्वादशीला परतीच्या प्रवासाला लागले. त्यामुळे पंढरपूर रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर रविवारी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
महिनाभराचा पायी प्रवास, उन्हा-पावसाची तमा न बाळगता केलेली वारी आणि विठुरायाचे मिळालेले दर्शन यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. पंढरी सोडताना मात्र विठ्ठलाच्या आठवणींनी अनेक वारकऱ्यांचे डोळे पाणावले.
Raigad News: पेणच्या बळीराजाला दिलासा; महापुरानंतर पावसाची साथ, भातशेतीत पुन्हा आशेचा अंकुर