
Belhe News, Alephata Traffic, Junnar Politics, Parking Crisis,
Junnar traffice News: वेगाने विकसित होत असलेल्या बेल्हे गावात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्याचा परिणाम आता वाहतूक व्यवस्थेवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. मुख्य रस्त्यांवरील सततची वाहतूक कोंडी, बसस्थानक परिसरातील गोंधळ आणि रस्त्यांवरच उभी राहणारी वाहने यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.वाढत्या वाहनसंख्येमुळे गावातील रस्त्यांचा अक्षरशः श्वास कोंडला असून, पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
गावाची लोकसंख्या वाढत असताना त्यानुसार पार्किंगची व्यवस्था मात्र विकसित झालेली नाही. अनेक ठिकाणी नागरिकांकडे स्वतःच्या वाहनांसाठी स्वतंत्र जागा नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर तसेच ग्रामपंचायतीच्या मोकळ्या आणि आरक्षित भूखंडांवर उभी केली जात आहेत. परिणामी, अनेक रस्ते पार्किंगच्या विळख्यात सापडले असून नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः बसस्थानक परिसर आणि गावातील प्रमुख मार्गांवर वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या नित्याची बनली आहे.चालकांना वाहन काढण्यासाठी आणि वळवण्यासाठीही कसरत करावी लागत असून,अनेकदा किरकोळ वादावादीचे प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गावातील काही नव्या घरांच्या बांधकामांमध्ये वाहनतळा साठी जागाच राखीव ठेवण्यात आलेली नसल्याने वाहनधारकांना रस्ताच पर्याय उरत आहे.त्यामुळे गल्लीबोळांतील रस्तेही पार्किंगच्या ताब्यात गेले असून, पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या आरक्षित भूखंडांवरही काही ठिकाणी वाहनांचे अतिक्रमण झाल्याचे चित्र दिसत आहे. या जागा भविष्यातील सार्वजनिक सुविधा आणि मुलांच्या खेळाच्या मैदानांसाठी राखीव असतानाही त्यांचा वापर पार्किंगसाठी होत असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “मुलांनी खेळण्यासाठी जायचे कुठे?” असा सवाल अनेक सुज्ञ पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या बेल्हे गावात विकासाच्या गतीसोबतच वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्याची गरज अधोरेखित होत आहे. वाढत्या अतिक्रमणांकडे ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
ग्रामपंचायतीच्या काही मोकळ्या व आरक्षित जागांवर वाहनांचे अतिक्रमण झाल्याने मुलांसाठी खेळण्याच्या जागांचा अभाव निर्माण झाला आहे.वाढत्या शहरीकरणात आधीच मोकळ्या जागा कमी होत असताना उपलब्ध जागाही पार्किंगसाठी वापरल्या जात असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने अशा अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून सार्वजनिक जागा नागरिकांसाठी खुल्या कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.