
फोटो सौजन्य - Social Media
तालुक्यातील शेलूबाजार ते शेंदूरजना मोरे हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी शुक्रवार (दि. ३०) पासून शेलूबाजार–शेंदूरजना मोरे रस्त्यावर उपोषण सुरू केले होते.
या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटत असल्याने अनेक अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिक आणि वाहनचालक जखमी झाले आहेत. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, शेतकरी आणि दैनंदिन प्रवासी यांना दररोज जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा निवेदने दिली होती. मात्र, दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेंदूरजना मोरे, नांदखेडा तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
नागरिकांच्या उपोषणाची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच मंगरुळपीरचे तहसीलदार यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी आमदार श्याम खोडे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून आंदोलक नागरिकांशी संवाद साधला. अधिकाऱ्यांनी नागरिकांना तातडीने दिलासा देत उद्यापासून रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, हा रस्ता आगामी अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला असून, मंजुरी मिळताच नवीन रस्त्याचे काम हाती घेतले जाईल, असे लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर नागरिकांनी आपले उपोषण मागे घेतले.
उपोषणस्थळी शेंदूरजना मोरे, नांदखेडा परिसरातील नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मात्र, यापुढे केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून, प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला आहे. एकूणच, शेलूबाजार शेंदूरजना मोरे रस्त्याच्या प्रश्नामुळे प्रशासनाला अखेर जाग येत उपोषणाची दखल घ्यावी लागली असून, आता दिलेली आश्वासने किती लवकर प्रत्यक्षात उतरतात, याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.