महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी वाढली आहे. दरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी, देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम असल्याची बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याला जबाबदार भाजप आहे, असाही आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या ?
प्रणिती शिंदे म्हणाल्या, वाढलेल्या मतदार संख्येच्या आकडेवारीवर आम्ही शंका उपस्थित केली. २०१९ ते २०२४ दरम्यान मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळपास ५ लाख मतदार संख्या वाढली. मात्र लोकसभा निवडणूक २०२४ ते विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान ७५ लाख मतदारांची संख्या कशी काय वाढली? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही, तोपर्यंत आमचा विश्वास बसणार नाही, असंही त्या म्हणाल्या. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली होती. शांतीत क्रांती करू असं सांगण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी कट-कारस्थान केलं. चार महिन्यांत मतदार इतके कसे वाढले हा आमचा थेट प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजाच्या तीव्र भावना होत्या, आता देवेंद्र फडणवीसच त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून थोपवले गेले आहेत. त्यामुळे ईव्हीएम सीएम असंच देवेंद्र फडणवीस यांना म्हणता येईल, अशी बोचरी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजना स्थगित
लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्यामुळे अनेक योजना स्थगित करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाचा जो निधी मिळतो त्यापैकी ७० टक्के निधी अद्याप मिळालेला नाही. रस्त्यांची कामं थांबवण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजनेचा निधी जवळपास ६० टक्के रक्कम थांबवण्यात आली आहे. अनेक कामं थांबवण्यात आली आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याला जबाबदार केवळ भाजप आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी राष्ट्रीय मतदारदिना निमित्त काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे कामकाज करत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, तरीही या संस्थेवर भयंकर अशा दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.