
Omraje Nimbalkar, Makarand Nimbalkar, Uddhav Thackeray, Eknath Shinde,
Omraje Nimbalkar Operation Tiger: ठाकरे गटातून नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ओमराजे निंबाळकर गेल्या महिनाभरापासून बंडखोरीच्या प्लॅनिंगमध्ये होते. पक्षांतराबाबत चर्चा झाली होती पण मला तो निर्णय मान्य नव्हता, असा दावा चुलत बंधू मकरंद राजे यांनी केला आहे. मकरंद राजेंच्या या दाव्यानंतर आत त्यांच्या पक्षांतराला घरातूनच विरोध असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी ओमराजेंच्या पक्षांतराच्या निर्णयापासून फारकत घेत ठाकरे गटासोबतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. (Maharashtra Politics news)
यासंदर्भात बोलताना मकरंदराजे म्हणाले की, “महिनाभरापूर्वी ओमराजेंनी माझ्यासोबत पक्षांतराबाबत चर्चा केली होती. पण मला त्यांचा निर्णय पटला नाही. त्यांनी त्यांचा निर्यण घेतला. मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला.२०२९ लाही आपण सहजपणे निवडून येऊ, असंही त्यांनी सांगितलं पण त्यांनी ऐकले नाही.व्यवस्थेला जाब विचारून काम करून घेणे ही शिवसेनेकडून अपेक्षा असते, यापुढेही तसंच काम होईल. पक्षाने आदेश दिला आणि गरज पडली तर मी ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावरही उतरायला तयार आहे.” दरम्यान मकरंदराजे निंबाळकर यांच्या या भूमिकेनंतर गेल्या १० वर्षांपासून राजकारणात एकत्र काम करणाऱ्या दोन भावांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्याचे चित्र दिसत आहे.
ओमराजे निंबाळकरांच्या बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरे यांनी धाराशिव दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच ओमराजेंनी पक्ष सोडला असला तरी शिवसैनिकांची गर्दी आणि ताकद कायम ठाकरेंसोबतच राहील, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी धाराशिवचे राजकारणही नव्या वळणावर येऊन ठेपले आहे.
धाराशिवच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून कट्टर राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या पाटील कुटुंबाकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे महायुतीत स्वागत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील (Archana Patil) यांनी ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून टोला लगावत, “छोटे छोटे जॅक टॉमी लावणे किंवा बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो,” असे वक्तव्य केले.
अर्चना पाटील म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत मतदार भावनिक झाल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता जर ओमराजे निंबाळकर विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत सहभागी होत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. अशा परिस्थितीत पाटील कुटुंबाकडून ओमराजे यांच्या संभाव्य महायुती प्रवेशाचे स्वागत केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, महायुतीकडून अधिकृत उमेदवारी किंवा पक्षप्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, अर्चना पाटील यांच्या वक्तव्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.