बारामती : काहीजण माझ्या सभेला येतात, तसेच विरोधी उमेदवाराच्या सभेला देखील जातात. हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे कुंकू एकाचंच लावायचा असतं, दोन्ही डगरीवर हात ठेवू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कार्यकर्त्यांना चिमटा काढला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी सभापती दिलीप खैरे, कालवा सल्लागार समिती सदस्य पोपट खैरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, तालुका दुध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, सरपंच तुषार हिरवे, भरत खैरे, ज्ञानेश्वर कौले, बी. के हिरवे, सुशांत जगताप, आप्पासो शेळके, माजी सभापती संजय भोसले, शारदा खराडे, अविनाश गोफणे, अनिल हिरवे, संजय दरेकर, बापुराव चांदगुडे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शिवसंग्राम पक्षाच्यावतीने महायुतीच्या उमेदवारास जाहिर पाठींबा देण्यात आला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यावर्षीची निवडणूक भावनिक नसून विकासाच्या मुद्द्यावर आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा. कोणतीही विकासकामे करायची झाल्यास केंद्राकडून ५० टक्के निधी राज्यासाठी आणावा लागतो. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यास विकासकामे करण्यास अडचण येत नाही. त्यामुळे नुसते भावनिक होऊन कामे होत नाहीत. तर त्याला विकासकामेच करावी लागतात. मागील दहा वर्षांत सध्याच्या खासदाराने कोणतीही विकासकामे आणली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.
आज येथे आलेले काही कार्यकर्ते विरोधकांच्या सभेला उपस्थित होते हे चालणार नाही. विरोधक सध्या गावोगावी जाऊन सभा घेत आहेत. कुठं जेवण, कुठं नाष्टा तर कुठं चहा घेण्यासाठी थांबत आहेत. पूर्वी तालुक्यातून एकच सभा घेत होते, आता पळावे लागत असल्याचा टोला अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला.
अजूनही आपल्याला विमानतळ, टर्मिनल, बारामती – फलटण रेल्वे तसेच बारामतीपर्यंत पुण्याची लोकल आणायची आहे. अशी अनेक विकासकामे येत्या पाच दहा वर्षांत करायची आहेत. ‘हर घर नल योजना’ही मोदींजींनी आणली. त्यांच्याशिवाय विकासकामे होणार नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पवार यांनी केले.
तेलंगणात ओव्हरफ्लो होणारे नद्यांचे पाणी १ लाख अश्वशक्तीच्या पंपाद्वारे उचलून परिसरातील तलाव भरण्यात येतात. त्याचप्रमाणे नद्याद्वारे ओव्हरफ्लो होणारे पाणी बारामती, पुरंदर, इंदापुर आणि दौंड या जिरायती भागातील ओढे व तलावतून सोडण्याच्या विचाराधीन आहे, असे पवार यांनी सांगितले.
दादा तुमची पिलावळ आवरा
गावागावात बोललं जात की दादा तुमचं काही नाही हो. पण तुमची पिलावळ आवरा! असा सूर अनेक ठिकाणी काढला जातो. पण एक लक्षात ठेवा, या निवडणुकीत तुम्ही मला म्हणजे माझ्या पत्नीला मतदान करणार आहात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत त्यांना त्याची जागा दाखवू ना, असा टोला अजित पवार यांनी लगावला.