
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातची वाट धरत आहेत. यामुळे महाराष्ट्राचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. याबाबत विरोधक देखील राज्य सरकारवर (State Govt) ताशेरे ओढत आहेत. अनेक उद्य़ोग तर शेजारच्या राज्यात जात असताना बॉलीवूडमधील (Bollywood) मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) देखील गुजरातमध्ये (Gujarat) होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फिल्मफेअर पुरस्काराबद्दल (69th Filmfare Award) ट्वीट केले.
जयंत पाटील यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन 69 वा फिल्मफेअर पुरस्कार गुजरातला गेल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी लिहिले आहे की, “मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा! दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे. आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे.” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
पुढे त्यांनी लिहिले, “बॉलिवूड हे मुंबईचे अविभाज्य घटक आहे. बॉलिवूडला मुंबईची आर्थिक नाडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोतावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. मुख्यमंत्री महोदय यावर काय उत्तर द्याल?” असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा! दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा @filmfare अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे. आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे. बॉलिवूड हे मुंबईचे… — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 16, 2024
बॉलीवूडमधील महत्त्वाचा मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार दरवर्षी मुंबईमध्येच केला जातो. फक्त 2020 साली तो गुवाहटीमध्ये पार पडला होता. त्याव्यतिरिक्त फिल्मफेअर हा नेहमी महाराष्ट्रामध्ये पार पडतो. मात्र यंदाचा 69 वा ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे 27 आणि 28 जानेवारी रोजी होणार आहे. गुजरात टुरिझमच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पण मुंबईमध्ये दरवर्षी रंगणार हा सोहळा या वर्षी गुजरातमध्ये होणार असल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.