
Gulabrao Patil
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याची माहिती समोर आली. या प्रवासामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
या चर्चांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. विमानातून प्रवास करणं ही सामान्य बाब असल्याचं सांगत त्यांनी या प्रवासाचा राजकीय अर्थ काढण्यावर प्रश्न उपस्थित केला.
गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, विमानातून कोणताही नेता प्रवास करू शकतो. “विमानामध्ये काय कोणीही प्रवास करू शकतो. माझ्यासोबत राहुल गांधीदेखील प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मनाई आहे का?” असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे केवळ एकाच विमानातून प्रवास केला म्हणून राजकीय समीकरणांबाबत निष्कर्ष काढणं योग्य नसल्याचं त्यांनी सूचित केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झाली नसल्याच्या चर्चेवरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांचा कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे भेट होऊ शकली नसेल, असं त्यांनी सांगितलं. एखाद्या कार्यक्रमादरम्यान एखाद्या नेत्याची भेट झाली नाही म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचंही पाटील म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधानांचा कार्यक्रम ठराविक वेळापत्रकानुसार चालतो, असं म्हटलं. “देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम असतो. ज्यांना वेळ दिलेली असते, त्यांना ते भेटतात,” असं ते म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागावी, त्यांनाही भेटीसाठी वेळ मिळेल, असा टोला त्यांनी लगावला.
बारामतीमध्ये पुन्हा विमान अपघात झाल्याच्या घटनेवरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अशा घटना घडणं योग्य नसल्याचं सांगत विमान वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. भारतीय विमान प्राधिकरणाने अशा घटनांची नोंद घेऊन त्यामागील कारणांचा अभ्यास करावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.