
२६ हजार हेक्टर पिकांना तडाखा! तब्बल २३,९५२ शेतकरी बाधित; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
यवतमाळमध्ये बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ९८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यात एकाच दिवसात तब्बल १३५ मिमी विक्रमी पावसाची नोंद होवून नदी, नाल्याला प्रचंड पूर आला. यासह जीवहाणीसह वित्त हानीसुध्दा झाली. तसेच २६ हजारावरील शेतपिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीच्या दणक्याने एका दिवसात शेतीचे होत्याचे नव्हते केले. यावर्षीच्या हंगामात सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसत आहे. आधीच १५ दिवस पेरण्या उशीरा झाल्या. त्यानंतर १२ ते १४ दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनावर दुबार पेरणीचे संकट कोसळले. त्यानंतर बोगस बियाण्यातूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काहीच उगवले नाही. यातून उरले सुरले पीक आता या अतिवृष्टीने गारद केले.(फोटो सौजन्य – AI)
जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून प्राथमिक अहवालानुसार ४४७गावातील २३ हजार ९५२ शेतकरी बाधित झाले आहेत. एकूण २६ हजार ०८८.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने केली असून पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील ९८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून अनेक भागात नद्या नाले दुथडी भरून वाहिल्याने शेती पाण्याखाली गेली.
यवतमाळ तालुक्यासह अनेक भागात जोरदार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी आणि तूर या प्रमुख खरीप पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. यात कापूस १४ हजार ९२३ हेक्टर, सोयाबीन ८ हजार १५ हेक्टर, तुर २ हजार ७९० तर भाजीपाला व फळपिकांना २ हजार २३८ हेक्टरवरील नुकसान झाले. यात सर्वाधिक फटका घाटंजी तालुकाला बसला असून तेथे तब्बल ७ हजार ६३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार कपाशीचे सुमारे २ हजार ०२ हेक्टर, सोयाबीनचे १ हजार २६७ हेक्टर आणि तुरीचे ७४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. इतर पिकांनाही फटका बसल्याची नोंद करण्यात आली आहे. बेंबळा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्या.
अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचून असल्याने पिके कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टीने उभ्या पिकांवर पाणी फिरल्याने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचे सावट निर्माण झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन मदत प्रक्रियेला गती देण्याचे काम सुरू केले आहे.