
कराड उत्तरमधील नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय - आमदार मनोजदादा घोरपडे
मसूर : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे महसूल विषयक प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय मिळाला आहे, असे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी म्हटले आहे.
मसूर (ता.कराड) येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यापूर्वीही दीड वर्षात कराड उत्तर मतदारसंघात सुमारे 21 जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे प्रलंबित प्रश्न मार्गस्थ केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, कराडच्या सभापती नंदा यादव, उपसभापती अनिता वेताळ, जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे, पंचायत समिती सदस्य डॉ. संतोष पाटील, कोमल यादव, धैर्यजा माने, संग्राम पवार, प्रदीप साळुंखे, संपतराव इंगवले, बाजार समिती सभापती संतोष इंगवले आदी उपस्थित होते.
आमदार घोरपडे म्हणाले, या मतदारसंघातील कराड-रहिमतपूर प्रमुख रस्त्यासाठी 286 कोटी रुपये निधीची मंजुरी मिळाली आहे. या मतदारसंघातील पानंद रस्त्यासाठी साडेसात कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, येत्या दीड वर्षात मतदारसंघातील सर्व पाणंद रस्त्याचे मुरमीमीकरण पूर्ण करू. यापुढे कराड उत्तरचा सर्वांगीण विकास हे ध्येय व शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी लालासाहेब जगदाळे, नंदा यादव, डॉ. संतोष पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रांत अतुल म्हेत्रे यांनी प्रास्ताविक केले. दिपाली बामणे व बाजीराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार कल्पना ढवळे यांनी आभार मानले.
सर्वसामान्यांना विनाकारण हेलपाटे नकोत
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका दिवसात होणारे काम तातडीने करावे. सामान्य माणसाला तलाठी, तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून गतिमान व लोकाभिमुख प्रशासन करावे. प्रशासकीय कामात अडथळा आणणारांना पाठीशी न घालता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी म्हटले आहे.
शासकीय योजनांचा लाभ मिळणार
शासन आपल्या दारी, सेवा थेट घरी या संकल्पनेला मूर्त रूप देणारे हे शिबिर सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असून नावातच समाधान आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या सोडवत त्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. लोककल्याणकारी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील.
– विठ्ठल इनामदार, अप्पर जिल्हाधिकारी