
बागायत शेती जात असल्याने वाढता विरोध
दिग्रज ता. जि. वर्धा ते बांदा ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पर्यंत 856.765 किमीच्या सुधारित महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे. यवतमाळ, बीड व लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील आखणीमध्ये सुधारणा केली आहे. महामार्ग संरचना बदलण्यात आली आहे. यापूर्वी पवनार जि. वर्धा ते पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग या 802.592किमी लांबीच्या शक्तिपीठ मार्गास मान्यता देण्यात आली होती. मात्र, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी बागायत शेती जात असल्याने विविध जिल्ह्यातून याला विरोध केला होता.
खर्चात 14 हजार कोटींची वाढ
शक्तिपीठ महामार्गासाठी ३ वर्षांपूर्वी सरकारने 57 हजार कोटी रुपये खर्च येईल असे सांगितले होते. त्यानतर सर्व आखणी केल्यानंतर या मार्गाला 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले होते. आता मात्र शक्तिपीठची आखणी काही प्रमाणात बदलण्यात आल्याने हा खर्च आता 1लाख 1हजार कोटीवर पोहोचला आहे.
13 जिल्ह्यांतील 40 धार्मिक स्थळे जोडली जाणार
महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतून,40 तालुक्यांमधून जात असून, महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे माहूर, कोल्हापूर यांचेसह 24धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्गाला सुधारितपणे मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्षात गावनिहाय नकाशा प्रसिद्ध केलेला नाही, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याच्या काही भागातून हा महामार्ग घेण्यात आला आहे. याचा खुलासा मात्र प्रत्यक्षात गावनिहाय यादी प्रसिद्ध झाल्यानंतर समोर येणार आहे.