
अपघातग्रस्तांना आता एक लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा
मुंबई:राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि गोरगरिबांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य इद्रिस नाईकवाडी यांनी या योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, योजनेतील त्रुटी दूर करून लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि व्यापक आरोग्यसेवा देण्यासाठी सरकार लवकरच महत्त्वपूर्ण सुधारणा करणार आहे.
आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ अधिकाधिक मिळावा यासाठी शासनामार्फत सुधारणा केल्या जातील. जसे, दरपत्रक सुधारणा : आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे एकत्रीकरण झाले असले तरी काही दरपत्रकांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली जाणार असून, डॉक्टर, अधिकारी आणि इतर संबंधित घटक यामध्ये समाविष्ट असतील.
MPSC Exam : भविष्यात MPSC ची मोठी भरती, परीक्षांसंदर्भातही CM देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा
शासनाने गोरगरिबांसाठी अनेक योजना लागू केल्या असून, त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकप्रतिनिधींचे आणि प्रशासनाचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच, या योजनेत आणखी कोणत्या सुधारणा करता येतील, याचा आढावा घेण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल. या लक्षवेधी सूचनेत विधान परिषद सदस्य भाई जगताप, श्रीमती उमा खापरे, अभिजित वंजारी, धीरज लिंगाडे, अमित गोरखे, चित्रा वाघ, सदाभाऊ खोत, सुनील शिंदे, विक्रम काळे यांनीही भाग घेतला.