manoj jarange patil reaction on mumbai high court decision on Maratha reservation
Jarange Patil on Mumbai High Court : मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांना ओबीसीमधून मराठा आरक्षण हवा असून याशिवाय मराठा समाजासाठी त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. यासाठी जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार आहेत. मात्र यावर हाय कोर्टाने नकार देत मुंबई बाहेर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील हे लाखो समर्थकांसह मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करायचे आहे. मात्र याला मुंबई हाय कोर्टाने नकार दिला आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचबरोबर खारघर, नवी मुंबईमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून असे खंडपीठाने नमूद केले. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई हाय कोर्टाच्या निकालानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही कायदा, संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत 100 टक्के जाणार, न्यायदेवतेचं पालन करु, कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल, असा विश्वास मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई उच्च न्यायालय शंभर टक्के परवानगी देणार, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जनतेचं गाऱ्हाण न्यायदेवता ऐकेल. लोकशाही मार्गाने जनता आंदोलन करु शकते. संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करतो आहे. मी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर येणार आहे. उद्या 10 वाजता आम्ही सगळे मराठे मुंबईकडे कूच करतोय. हा सरकारचा खेळ आहे, न्यायदेवतेचा नाही. रास्त मागण्या आहेत. कायद्याला धरुन आंदोलन आहे, म्हणून पोटदुखी आहे, असा टोला देखील मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अंतरवाली सराटीत पोलिस बंदोबस्त वाढला
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. अंतरवाली सराटीचया सीमेवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईत पुढील दहा दिवस ही अत्यंत धावपळीचे धामधुमीचे असणार आहेत. या काळात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. 29 तारखेला मुंबईत जाणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.