'महाविकास आघाडीची जिथे सत्ता, तिथे निधी नाही'; मंत्री नितेश राणे यांच्या विधानाने खळबळ
कुडाळ : नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारे राज्याचे मत्स्य व्यवसाय विकासमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा ‘त्या’ गावांना निधी देणार नसल्याचा इशारा दिला आहे. ‘ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे, महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कुडाळमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे धक्कादायक विधान केले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये तालुका कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा, असे विधान केले. मी माझ्या लोकांना सांगितले आहे की, उबाठा आणि या विकास आघाडीचे अस्यक असलेल्या गावांची यादी काढा.
जिथे-जिथे उबाठा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, त्या गावात एका रुपयाचाही निधी देणार नाही. एवढे मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही, असेही नितेश राणे यांनी सांगितले.
आपला बॉस खंबीर
महायुतीचा झेंडा दिसला नाही की, निधी बंद. बोंबलत बसू द्या माझ्या नावाने, काही फरक पडत नाही. आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे. मला काही चिंता नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
फक्त महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाच निधी मिळणार
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले, मी तुम्हाला विश्वास देतो की, येणाऱ्या दिवसांत जिल्हा नियोजनचा निधी असेल, सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कोणालाही मिळणार नाही. कोणालाच मिळणार नाही.
विकास हवा असेल तर भाजपात प्रवेश करा
कोणाला गावाचा विकास करायचा असेल, तर इथे येऊन प्रवेश करून जा; भरघोस काम होतील, नाहीतर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हातचे राखून ठेवत नाही, असे ते म्हणाले.