
Solapur News, MLC Election 2026, Maharashtra Politics,
निवडणूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत अर्ज विक्रीत वाढ झाली. सोमवार, २६ मे रोजी एकूण ४ अर्जांची विक्री झाली. त्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या एका इच्छुकाने दोन अर्ज खरेदी केले, तर दोन अपक्ष इच्छुकांनी प्रत्येकी एक अर्ज घेतला.
मंगळवारीही अर्ज विक्रीचा वेग कायम राहिला. काँग्रेसच्या एका इच्छुकाने पुन्हा दोन अर्ज घेतल्याने पक्षांतर्गत स्पर्धा वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे. पर्यायी व्यवस्था किंवा तांत्रिक कारणांसाठी एकाच उमेदवाराकडून दोन अर्ज खरेदी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याशिवाय दोन अपक्ष इच्छुकांनीही प्रत्येकी एक अर्ज घेतल्याने निवडणुकीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने इच्छुकांकडून हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी निश्चितीबाबत अद्याप संभ्रम कायम असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि अस्वस्थता दोन्ही वातावरण दिसून येत आहे.
विधान परिषद निवडणुकीतील एकूण ६१६ मतदारांपैकी भाजपकडे ३०७ मते आहेत. विजयासाठी ३०८ मतांची आवश्यकता असल्याने भाजपला केवळ एका अतिरिक्त मताची गरज आहे. महापालिका, जिल्हा परिषद-पंचायत समिती आणि नगरपरिषदांमधील संख्याबळ पाहता भाजपची स्थिती मजबूत मानली जात असली तरी उमेदवाराच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. भाजपकडून माजी आमदार राम सातपुते, प्रशांत परिचारक, राजन पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत तसेच माजी जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार यांची नावे चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देणार याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपकडे संख्याबळ असले तरी उमेदवार निवडीत सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू असून मुंबई-दिल्ली दौरेही वाढल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे काँग्रेसकडे या निवडणुकीत केवळ ९६ मते आहेत. त्यामुळे स्वबळावर विजय मिळवणे काँग्रेससाठी जवळपास अशक्य मानले जात आहे. मित्रपक्षांची मदत मिळाली तरी विजयाची खात्री नसल्याने काँग्रेसचे राजकीय गणित गुंतागुंतीचे बनले आहे. काँग्रेसकडून उमेदवारीबाबत अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली तरी काही इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि मतांची अपुरी संख्या यामुळे काँग्रेस नेतृत्व सावध पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अर्ज विक्री वाढत असल्याने येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्यास निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.