
Jayant Patil, Devendra Fadnavis, NCP SP, Maharashtra Politics
सुत्रांच्या हवाल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या तीनही नेत्यांनी जवळपास सव्वा तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची स्वतंत्र बैठक झाल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर जयंत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत ‘तटकरे आणि पटेल यांच्यासोबत माझी बैठक झाली नाही’ असं म्हटलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “माझी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत कोणतीही बैठक झालेली नाही. माझ्या भेटीचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते ‘वर्षा’ निवासस्थानी गेले होते.
मी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचलो आणि सुमारे पाच मिनिटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पावणेअकराच्या सुमारास तेथून बाहेर पडलो. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेदेखील तिथे उपस्थित होते, याची मला कोणतीही माहिती नव्हती,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असले, तरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.