
BEST Bus Action On Mobile Phone Driving News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष तपासणीदरम्यान काही चालक बस चालवत असतानाच मोबाईलवर बोलताना किंवा फोन हाताळताना आढळले तर, चालकांवर आर्थिक दंड लावला जाईल, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, प्रवासांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यक्तींचा कोणत्याही प्रकाराचा निष्काळजीपण अजिबात सहन केला जाणार नाही.
या मोहिमेची खास गोष्ट सांगायची तर, अधिकारी हे सिव्हिल कपड्यांवर साधे प्रवाशी म्हणून प्रवास करतील. चालक वाहन चालवताना मोबाईलवर बोलतो का, इअरफोन लावतो का किंवा सुरक्षितपणे गाडी चालवतो का? यासर्व गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाईल. चालकाला कोणतीही पूर्व माहिती नसताना त्यावर लक्ष दिले जाणार आहे.
पुढे प्रशासनाने स्पष्ट केले की, पहिल्यांदा नियम तोडणाऱ्यांवर दंड आकारला जाईल. मात्र, तीच चूक पुन्हा घडली असता, दंडाची रक्कम वाढवली जाणार आहे. एखादा चालक वारंवार नियम मोडत असल्याचे आढळल्यास संबंधित खासगी बस ऑपरेटरविरोधातही शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे चालकांसोबतच बस चालवणाऱ्या कंपन्यांनाही जबाबदारीने काम करावे लागणार आहे.
ही मोहीम अचानक सुरू करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी घडलेल्या गंभीर बस अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. त्यानंतर बेस्ट प्रशासनाने सर्व डेपोंमध्ये तपासणी वाढवण्याचा निर्णय घेतला. आता शहरातील प्रत्येक डेपोमध्ये वेळोवेळी अचानक तपासण्या केल्या जाणार असून, चालकांच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
तपासणी पथके केवळ मोबाईल वापरण्यावरच लक्ष देणार नाहीत, तर वाहन चालवताना चालकाचे वर्तन, वाहतूक नियमांचे पालन, प्रवाशांशी वागण्याची पद्धत आणि सुरक्षित ड्रायव्हिंगशी संबंधित इतर बाबींचीही नोंद ठेवतील. कोणतीही गंभीर त्रुटी आढळल्यास त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
दरम्यान, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी बेस्टकडून आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. काही वर्षांपासून रखडलेली इलेक्ट्रिक डबल डेकर बसांची योजना पुन्हा वेगाने पुढे नेण्याची तयारी सुरू झाली आहे. या नव्या बसेस सेवेत दाखल झाल्यानंतर पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सुरक्षित सेवा देणे आवश्यक असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काळात नियम मोडणाऱ्या चालकांवर अधिक कडक नजर ठेवली जाणार असून, निष्काळजीपणाला कोणतीही माफी मिळणार नाही. सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हीच काळाची गरज असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.