
पुन्हा मोठी कारवाई होणार ! तुकाराम मुंढेंनी हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिला 'हा' इशारा
मुंबई : एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वात राज्यभरात अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे. राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाने अन्न भेसळ आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या धडक कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मुंढेंनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.
व्यवसाय छोटा असो वा मोठा, अन्नाचा दर्जा आणि सुरक्षेच्या नियमांशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे तुकाराम मुंढेंनी यावेळी स्पष्ट केले आहे. एफडीएच्या या विशेष मोहिमेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागाची भूमिका सविस्तर मांडली. यावेळी तुकाराम मुंढे म्हणाले, “सर्वात आधी आपल्याला सरकार आणि आमच्या विभागाचा या कारवाईमागील दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. जुना ‘अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा’ आता इतिहासजमा झाला”.
तसेच, २००६ मध्ये ‘फूड सेफ्टी अँड स्टँड अॅक्ट’ अस्तित्वात आला आहे. २०११ पासून या कायद्याची देशभर अंमलबजावणी सुरू आहे. म्हणजेच, आपण आता केवळ भेसळ रोखण्याच्या काळात नाही, तर ‘अन्न सुरक्षा आणि उच्च दर्जा’ सुनिश्चित करण्याच्या युगात जगत आहोत.
सर्वच व्यावसायिकांना नियम पाळावेच लागणार
अन्न व्यवसायाशी संबंधित आणि परवानाधारक असलेल्या प्रत्येकाने या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, दुर्दैवाने अजूनही अनेक व्यावसायिक या अनिवार्य नियमांकडे आणि सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होतो. जनतेच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही, म्हणूनच आम्ही आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, असे मुंढे यांनी सांगितले.
नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित
राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई केली आहे. अवघ्या दोन दिवसांत 20 नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने 7 हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले, तर आवश्यक परवाना नसलेल्या 4 हॉटेल्सना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.