
पुन्हा लोकलचा जीवघेणा प्रवास! सकाळच्या गर्दीत धडकी भरवणारी घटना, दिवा-मुंब्रादरम्यान महिला थेट पडली रुळावर; पाहा Video
Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकलकडे पाहिलं जातं. मात्र मुंबईत सकाळच्या ‘पीक अवर्स’ (सकाळी ७.०० ते १०.००) दरम्यान लोकल ट्रेनचा विलंब, गर्दी या सर्व कारणांमुळे प्रवाशांना ऑफीसमधल्या लेटमार्कला सामोरे जावं लागत. विशेषतः मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर तांत्रिक बिघाड, पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामे (जसे की फलाट विस्तार) आणि ऐन वेळेस रद्द होणाऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
याचदरम्यान आज (10 सप्टेंबर 2026) मध्य रेल्वेवरील सकाळच्या गर्दीच्या वेळेत डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली. डोंबिवली स्थानकातून सकाळी 7.56 वाजता सुटलेल्या लोकलमधून दिवा-मुंब्रादरम्यान एक महिला प्रवासी थेट रेल्वे रुळावर पडली. सुदैवाने सिग्नलमुळे लोकल थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेनंतर घाबरलेल्या काही महिला प्रवाशांनी रुळावरून चालत मुंब्रा स्थानक गाठल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे गर्दीच्या वेळेतील लोकल प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सकाळी 7.56 वाजताची डोंबिवली-CSMT लोकल नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या गर्दीने भरलेली होती. दिवा स्थानक ओलांडल्यानंतर मुंब्र्याजवळ सिग्नल असल्याने लोकलचा वेग कमी झाला आणि गाडी थांबली. याचवेळी डब्यातील प्रचंड गर्दीत दाराजवळ असलेल्या महिला प्रवाशाचा तोल गेला आणि ती खाली रुळावर पडली. महिला रुळावर पडल्याचे पाहून डब्यातील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तिला मदत केली. महत्त्वाचे म्हणजे लोकल त्या क्षणी थांबलेली होती. त्यामुळे संभाव्य गंभीर दुर्घटना टळली.
या घटनेनंतर लोकलमधील काही महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. डब्यातील गर्दी आणि पुढील प्रवासाचा धोका लक्षात घेऊन काही महिलांनी लोकलमधून खाली उतरून रेल्वे रुळांवरून चालत मुंब्रा स्थानक गाठण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाबही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. रेल्वे रुळांवरून चालणे अत्यंत धोकादायक असून दुसऱ्या मार्गावरून येणाऱ्या गाडीमुळे मोठी दुर्घटना घडू शकते.
स्थानिक प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावर आधी वातानुकूलित लोकल धावते. त्यानंतर येणाऱ्या साध्या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. प्रवाशांना डब्यात उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नसल्याने अनेक जण दरवाजाजवळ प्रवास करताना दिसतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेतील लोकलचे नियोजन आणि सामान्य लोकलच्या फेऱ्यांची संख्या याबाबत प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गावर तीव्र वळण आहे. या भागात यापूर्वीही गर्दीच्या लोकलमधून प्रवासी पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत अतिरिक्त लोकल चालवाव्यात, साध्या लोकलवरील प्रवासी भार कमी करण्यासाठी वेळापत्रकाचा फेरविचार करावा आणि दिवा-मुंब्रा पट्ट्यात सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.