
'अर्थ अवर' पाळण्यास मुंबईकर निरुत्साही! पर्यावरण विषयावर प्रचंड खल, चर्चेचे ठोस कृतीत रूपांतर होईना
हवामान बदल, पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा बचतीवर मोठमोठ्या चर्चा करणारे प्रत्यक्ष कृतीच्या वेळी मात्र मागे पडत आहेत का, असा सवाल यंदाच्या ‘अर्थ अवर’च्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पर्यावरण आणि हवामान बदला बाबत जागरूकता करण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ‘लाईट बंद’ करून जगभरात अर्थ अवर साजरा केला जातो. या साध्या प्रतीकात्मक कृतीतही शहराचा उत्साह ओसरल्याचे चित्र दिसत असून, पर्यावरणाबाबतचा जागरूकतेचा गजर केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित राहिला आहे का, अशी टीका होत आहे. नेमके शनिवारी अर्थ अवरच्या वेळेत आयपीएल सामने सुरु असल्याने अर्थ अवर पाळण्यावर २५ टक्के फरक पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
२००७ पासून सुरू झालेल्या ‘अर्थ अवर’ या जागतिक उपक्रमाचे यंदा २०वे वर्ष असून मात्र प्रतीकात्मक ‘एक तास अंधार पाळण्याचीही तयारी कमी होत असेल, तर पर्यावरण संवर्धनाच्या मोठ्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहणे अपरिहार्य ठरत आहे. मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राकडून नेहमीप्रमाणे रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत अनावश्यक दिवे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे केंद्राचे उमेश कुमार यांनी सांगितले. मात्र यंदा या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये साशंकता आहे. दरम्यान, याच वेळेत सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांमुळे नागरिकांचा कल टीव्हीसमोर अधिक आणि ऊर्जा बचतीकडे कमी असल्याचे चित्र आहे.
यावर पर्यावरण दक्षता मंचचे विद्याधर वालावलक यांनी यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. ‘रात्र खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांमुळे मोठ्या प्रमाणात वीजेचा अपव्यय होती. त्याचबरोबर वीज वापरातून होणारे अप्रत्यक्ष कार्बन उत्सर्जन (स्कोप २) देखील वाढते. ऊर्जा बचतीचा संदेश देताना आपणच मोठ्य प्रमाणात वीज वापरत असू, तर ही दुटप्पी भूमिक ठरते. सामने दिवसा घेण्याचा विचार व्हायला हवा असे वालावलकर यांनी सुचवले.