
फोटो सौजन्य - Social Media
चेंबूर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आता मुंबईतील स्थानिक प्रशासन अलर्ट झालं आहे. सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या संध्या दोशी यांनी आपल्या प्रभागातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचा आढावा घेत त्यांनी पावसाच्या पाण्याचा निचरा, नाले व ड्रेनेज व्यवस्थेची स्थिती तसेच धोकादायक झाडांची तपासणी केली.
या पाहणीदरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, रस्त्यांवर पाणी साचू नये आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी तातडीच्या दुरुस्तीची गरज आहे, त्या कामांना विलंब न लावता प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी संध्या दोशी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडविण्याबाबत प्रशासनाशी समन्वय साधला. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आवश्यक नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी शिवसेना सातत्याने मैदानात उतरून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
“जनतेची सुरक्षितता आणि नागरिकांची सेवा हेच शिवसेनेचे ध्येय आहे. प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना नागरिकांसोबत खंबीरपणे उभी राहील,” असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.