शहराची स्वच्छता अबाधित राखण्यासाठी प्रतिकूल हवामानातही कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची, आरोग्याची आणि कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उत्कृष्ट सफाई मित्रांची निवड नियमित उपस्थिती, सुरक्षित कामपद्धती, शिस्तबद्ध कामकाज, शासनाच्या योजनांचा लाभ, प्रशिक्षणांमधील सहभाग तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी दिलेल्या योगदानाच्या आधारे करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे महत्त्व, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर आणि त्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष श्री. दिलीपभाऊ बगाडे, उपनगराध्यक्ष श्री. प्रकाश गोळे, आरोग्य सभापती सौ. राजश्री सणस, मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील, सर्व नगरसेवक तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी नगराध्यक्ष श्री. दिलीपभाऊ बगाडे यांनी हिलदारीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
सुरक्षिततेसोबत आरोग्यालाही तितकेच महत्त्व देत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ५० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला असून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.
या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, त्यांच्या कार्याचा गौरव करून इतर कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






