
District Collector conducts three-hour inspection to make 12th exam cheating-free
Nanded News : नांदेड : सध्या राज्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणताही गैरप्रकार करु नये यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर नायगाव तालुक्यातील (Nanded News) बारावीच्या गणिताच्या पेपरच्या दिवशी बरबडा येथील जवाहरलाल नेहरू परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तीन तास प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. ही केवळ औपचारिक भेट नव्हती; तर “कॉपीमुक्त परीक्षा” या उद्दिष्टाने राबविलेल्या शैक्षणिक सफाई अभियानाचा ठोस भाग होता. (HSC Exam)
गणित हा तुलनेने कठीण विषय मानला जात असल्याने काही केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. नायगाव तालुक्यातील काही परीक्षा केंद्रांविषयी तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सकाळी सव्वा अकरापासून दुपारी सव्वा दोनपर्यंत त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन आसनव्यवस्था, पर्यवेक्षकांची दक्षता आणि परीक्षा प्रक्रियेची शिस्त तपासली.
हे देखील वाचा : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी
नायगाव तालुक्यातील परीक्षा व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर
परीक्षा केंद्र परिसरात अनावश्यक वर्दळ होऊ नये, यासाठीही त्यांनी दक्षता घेतली. परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप करू पाहणाऱ्या काही संबंधितांना स्पष्ट सूचना देत केंद्राबाहेर जाण्यास सांगितले. “परीक्षेत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. याआधी सोमठाणा येथील नव्याने स्थापन झालेल्या केंद्रावरही त्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी भेट देऊन प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता, सीलबंद पाकिटांची स्थिती आणि पर्यवेक्षकांची नेमणूक याची खातरजमा केली होती. प्रशासनाची ही सतर्कता परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा भाग मानली जात आहे. बरबडा केंद्रावर उत्तरपत्रिका संकलन आणि सीलिंग प्रक्रियाही त्यांच्या देखरेखीखाली पार पडली. नोंदी, पंचनामा आणि वाहतूक व्यवस्थेची खात्री झाल्यानंतरच त्यांनी केंद्र सोडले. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे संपूर्ण यंत्रणा अधिक जागरूक झाल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे जिल्ह्यात स्पष्ट संदेश गेला आहे की, परीक्षेत गैरप्रकारांना मुळीच थारा दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांमध्येही प्रामाणिकपणे परीक्षा देण्याची भावना दृढ होत असल्याचे चित्र आहे.
हे देखील वाचा : विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन का? हा भाजपचा अहंकार; संजय राऊतांची जोरदार टीका
ध्येय प्रत्यक्षात साकार
प्रशासनाच्या या शैक्षणिक सफाई अभियानामुळे परीक्षा प्रक्रियेवर विश्वास वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता पुढील आव्हान म्हणजे ही मोहीम सर्व केंद्रांवर सातत्याने आणि काटेकोरपणे राबविणे. अचानक भेटी, निरीक्षण पथके आणि कडक अंमलबजावणी यांच्या माध्यमातूनच कॉपीमुक्त परीक्षा हे ध्येय प्रत्यक्षात साकार होऊ शकते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकाराने शिक्षण व्यवस्थेत शिस्तीचे नवे पान उघडले आहे.