
Nanded-Waghala Municipal Corporation Mayor Kavita Mule responsible for overall development city
संतोष कुलकर्णी : नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत सत्तांतरानंतर शहराच्या अपेक्षा लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. महापौर कविता मुळे यांच्या नेतृत्त्वाखालील नव्या कारभारासाठी पुढील ३० आणि १०० दिवस हे केवळ औपचारिक टप्पे नसून, प्रत्यक्ष कामगिरीची कसोटी मानले जात आहेत. प्रारंभी पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि तक्रार निवारणावर भर देत प्रशासनाने सक्रियतेचे संकेत दिले आहेत. (Nanded News)
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा सुनिश्चित करणे ही सर्वांत मोठी जबाबदारी ठरत आहे. गळती दुरुस्ती ४८ तासांत पूर्ण करणे. जलवाहिन्याच्या कामाची माहिती सावजानक करणे आणि पाणीपुरवठ्याची नियमितता वाढवणे या बाबी तातडीच्या आहेत. पुढील ३० दिवसांत स्वच्छता तक्रारींमध्ये किमान १५ टक्के घट आणि कचरा संकलनाचे वेळापत्रक जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मालमत्ता कर व नळपट्टी वसुलीत किमान १० टक्के घट साध्य करणे महत्त्वाचे ठरेल.
हे देखील वाचा : निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
सक्रियता परिणामात दिसण्याची अपेक्षा
त्यामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. १०० दिवसांच्या आराखड्यात रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, एलईडी स्ट्रीटलाइट, दवाखान्यांची कार्यक्षमता आणि मनपा शाळांचा दर्जा उंचावणे यांसारख्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अपेक्षित आहे. डिजिटल प्रशासनालाही गती देणे आवश्यक असून जन्म-मृत्यू दाखले, बांधकाम परवाने आणि कर भरणा ऑनलाईन व वेळेत उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे. अर्ज प्रक्रियेचा कालावधी ५० टक्क्यांनी कमी झाला, तर ते मोठे यश ठरेल. अडथळे आणि निधीअभावी प्रशासकीय विलंब ही आव्हाने असली, तरी राजकीय स्थैर्य आणि समन्वयातून त्यांवर मात करावी लागणार आहे. पुढील शंभर दिवसांत सक्रियता प्रत्यक्ष परिणामांत दिसली, तर नांदेडच्या विकासाला नवी दिशा मिळेल; अन्यथा अपेक्षाभंग टाळता येणार नाही.
हे देखील वाचा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”
प्रभाग ९ मधील समस्या सोडवा
शहरातील नांदेड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. ९ मधील विविध नागरी समस्यांवर तत्पर कारवाई करण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनासमवेत विशेष बैठक घेतली. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून थेट चर्चा करण्यात आली आणि प्रलंबित प्रश्न आठ दिवसांत निकाली काढण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बैठकीस नगरसेवक किशोर स्वामी, सदिच्छा सोनी पाटील, डॉ. मंजुषा रानवळकर व बलवंतसिंघ गाडीवाले उपस्थित होते. बांधकाम विभागाचे अभियंता सुमंत पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभागातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. काही ठिकाणी नियमित पाणीपुरवठाच होत नसल्याचेही निदर्शनास आले. यावर नगरसेवकांनी आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. तसेच ड्रेनेज लाईन ब्लॉकेज, फुटलेली चेंबर्स आणि रस्त्यावर साचणारे सांडपाणी याबाबत तातडीने दुरुस्ती करून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रभागात कोचिंग क्लासेस व विद्याथ्यर्थ्यांच्या हॉस्टेल्सची संख्या मोठी असल्याने वाहतूक व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे रबरी गतिरोधक बसविणे, नवीन पथदिवे उभारणे व बंद दिवे दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.