
Congress state president Harshvardhan Sapkal Pune press strongly criticizes BJP agitation
पुणे : आकाश ढुमे पाटील : मागील आठवड्यामध्ये पुण्यामध्ये कॉंग्रेस भवनावर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यामध्ये अनेक कार्यकर्ते आणि महिला पोलीस जखमी झाले. टिपू सुलतान वक्तव्यावरुन हा वाद उफाळला. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्याक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यातील (Pune News) या आंदोलनप्रकरणी भाजपवर गंभीर आरोप करत तीव्र टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान सोबत केल्याचा आरोप करत भाजपच्या पुणे शहर संघटनेने काँग्रेस भवनावर मोर्चा काढला होता. त्या वेळी आंदोलन हिंसक वळणावर गेले, त्या दिवशी झालेल्या दगडफेकीत नऊ जण जखमी झाले. यावर हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी प्रतिक्रिया दिली.
या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना सकपाळ म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती सारखीच आहे. पुण्याचे प्रथम नागरिक आंदोलनामध्ये पक्ष म्हणून सहभागी होतात. परंतु रामशास्त्री प्रभुणे यांच्या पुण्याचा भाजपकडून तालिबान केला आहे. काँग्रेस हा संविधाननिष्ठ पक्ष असून हिंसेवर आमचा विश्वास नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत आंदोलन करणे योग्य आहे; मात्र संवाद व चर्चा होणे आवश्यक आहे. अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे,” परंतु हिंसेचे आम्ही समर्थन करत नाही, असा गंभीर आरोप केला आहे.
हे देखील वाचा : ब्रिटनच्या राजघराण्याला सुरंग! माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर Epstein Files मुळे गोत्यात
प्रदेशाध्यक्षपदाची वर्षपूर्ती निमित्त पुणे शहर काँग्रेसतर्फे हर्षवर्धन सकपाळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे, मोहन जोशी तसेच महापालिकेतील गटनेते चंद्रकांत कदम आणि आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. आज काँग्रेस भवन परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. ही दक्षता संबंधित दिवशी पुणे पोलिसांनी घेतली असती, तर हिंसक घटना घडली नसती. पोलिसांनी ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या तत्त्वानुसार कार्य करावे,” असा टोला सकपाळ यांनी लगावला.
पुणे महापालिकेतील निकालाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “अपेक्षित यश मिळाले नसले तरी निवडून आलेले नगरसेवक पुणेकरांच्या प्रश्नांवर ठामपणे कार्य करतील. गेली चार वर्षे महापालिकेवर प्रशासक कारभार होता; त्या काळातील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणला जाईल. वाहतूक, पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर काँग्रेस रस्त्यावर उतरून आवाज उठवेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : अनिकेत तटकरेंनी केले DCM सुनेत्रा पवारांच्या गाडीचे सारथ्य; सुषमा अंधारेंनी साधला निशाणा
महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून, पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रत्येक अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतो आणि लोकशाहीला तिलांजली देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारचे कामकाज अत्यंत बेफिकीर आणि टपोरीपणासारखे असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. हे सरकार लुटारू असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी विविध मुद्द्यांवर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली. पुणे-मुंबईतील कथित जमीन घोटाळ्यांमध्ये किती आर्थिक गैरव्यवहार झाला, याची माहिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर येत असल्याचा दावा करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे म्हटले. पोलिसांनी ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या तत्त्वानुसार काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस यापुढे अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.