
पारा ४१.४ अंशावर...! हंगमातील उच्चांकी तापमानाची नोंद, नाशिक @ ३९.५; सतर्कतेच्या सूचना
गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. परंतु, ११ मार्चपासून शहरात उन्हाच्या तीव्रतेत अचानक वाढ झाली आहे. सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उष्णा जाणवत आहे. त्यामुळे दिवसा उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर रात्रीच्या वेळी पडणाऱ्या उकड्याने नागरिक हैराण झाले आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या तीव्रता आणखीनच वाढत असल्याने रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. उष्णतेची लाट पाहता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले आहे. आरोग्यविषयक गंभीर समस्या लक्षात घेता प्रशासनाने महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, परिवहन, कामगार, महिला व बालविकास, पशुधन औद्योगिक विकास महामंडळासाठी मार्गदर्शक सूचना जरी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यंदा एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यातच तपमानाचा पारा ४१.४ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य व सूर्याच्या प्रकोपाने कायम राहील असे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत असतो मात्र यंदा एप्रिलमध्ये सूर्यदेव कोपला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात ४१ अंश पर्यंत सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. राज्यात अवकाळी पावसानंतर उष्णतेची लाट उसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून कसमादेत उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा दिवसागणिक वाढू लागला आहे सध्या ४१ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले.
किमान तापमान देखील वाढू लागले आहे. मागील तीन दिवसात किमान तापमानामध्ये ४ अंशांची वाढ झाली असून रविवारी २०.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. यामुळे रात्रीच्या वेळी कमालीचा उकाडा जाणवत असल्याने घरात बसने देखील कठीण होत आहे. तसेच उकाड्याने मोठी अस्वस्थता जाणवत आहे.