
one minister one department shinde government descision nrvb
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) या दोघांच्या उपस्थितीतच यापूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या होत्या. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला नवनिर्वाचित १८ मंत्र्यांचीही (18 Ministers) उपस्थिती होती. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना बाहेर पाठवून आपल्या सहकारी मंत्र्यासोबत चर्चा केली.
भाजप पक्षामध्ये ‘एक पद, एक व्यक्ती’ (One Post, One Person) असे सूत्र आहे त्याच धर्तीवर राज्य मंत्रिमंडळात ‘एक मंत्री, एक खाते’ (One Minister One Department) हे सूत्र अवलंबिणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता इतर मंत्र्यांकडे फक्त एकाच खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा अधिक विस्तार करायचा आहे तोपर्यंत एकदा दुसऱ्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे अधिक खाती देण्यात येणार आहेत. आगामी अधिवेशनाच्या दृष्टीने कारभार अधिक सोपा व्हावा यासाठी हे तात्पुरते खातेवाटप असेल असेही या सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असेल याची वाच्यता न होण्याची खबरदारी घेण्यात आली होती. त्याचपद्धतीने कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते दिले जाणार आहे याबाबत गुप्तता बाळगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रत्येक मंत्र्याला एक पाकीट दिले जाणार असून त्यात त्या मंत्र्याला देण्यात येणाऱ्या खात्याचे नाव लिहिलेले असणार आहे.
[read_also content=”भांडुप ऐरोली नाक्यावर नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई; २६६ किलो गांजासह २ जणांना अटक https://www.navarashtra.com/crime/narcotics-cells-big-operation-at-bhandup-airoli-naka-2-persons-arrested-with-266-kg-of-ganja-nrvb-314622.html”]
मंत्र्यांच्या या बैठकीत ज्येष्ठ मंत्र्यांनी मंत्रालयाजवळ बंगले नको अशी मागणी केली. मंत्रालयाजवळ बंगले असल्यास आगंतुकांची गर्दी वाढते आणि काम करणे मुश्किल होते. तसेच अनेकदा मंत्रिमंडळाची बैठक किंवा खात्याची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात येते. त्यामुळे वाहन कोंडीपासून वाचण्यासाठी मंत्रालयापासून लांब आणि सह्याद्री अतिथीगृहापासून जवळ अशा मलबारहील येथील बंगल्याना या मंत्र्यांची पहिली पसंती असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कोरोनामुळे बाहेरील व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश देण्यात येत नव्हता. दरम्यानच्या काळात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र मुख्यमंत्रीच मंत्रालयात येत नसल्यामुळे येथे येणाऱ्यांचे प्रमाण अगदीच कमी होते. मात्र, शिंदे सरकारचे सरकार येऊन काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या मंत्र्यांनी शपथ घेऊन आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे आपल्या आमदाराला मंत्री झालेले पाहण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी मंत्रालयात उपस्थिती दर्शविली होती. आज मंत्रालयात येणाऱ्या व्हिजिटर्सची संख्या २६८३ इतकी होती.