
'शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज पोहोचवण्यात सहकाराची भूमिका महत्त्वाची'; आंतरराष्ट्रीय सहकार दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन
केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज आणि विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि ‘सहकारी महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने शंभर वर्षांपूर्वीच सहकार चळवळीचे महत्त्व ओळखत शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी सहकारी संस्थांची उभारणी केली. त्यानंतर पतसंस्था, सहकारी बँका, कृषी, दुग्धव्यवसाय, गृहनिर्माण आणि मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांत सहकाराची मजबूत पायाभरणी झाली.
धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील आणि वैकुंठभाई मेहता यांसारख्या सहकार क्षेत्रातील दिग्गजांचे योगदानही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
PMRDA News: पीएमआरडीए गतिमान होणार! ६१ ‘एमपीएससी’ लिपिक लवकरच सेवेत रुजू
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असून देशातील सर्वात मोठे सहकारी जाळे या राज्यात आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये प्रथमच स्वतंत्र केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्याचा उल्लेख केला. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सहकार धोरण, ६३ हजार प्राथमिक कृषी पतसंस्थांचे डिजिटायझेशन, पाच वर्षांत दोन लाख नवीन ‘पॅक्स’ उभारण्याचा निर्णय, तसेच राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था, ऑर्गॅनिक्स संस्था आणि बीज सहकारी समितीसारख्या उपक्रमांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
सहकारी बँकांच्या कामगिरीचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले की, एकेकाळी सहकार क्षेत्र कॉर्पोरेट क्षेत्राशी स्पर्धा करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र प्रत्यक्षात सहकारी बँकांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज पोहोचवत असून ग्रामीण विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहनिर्माण सहकारी संस्थांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील ४० ते ४५ टक्के सहकारी संस्था या गृहनिर्माण क्षेत्रातील आहेत. स्वयं पुनर्विकास धोरणामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वतःचा पुनर्विकास करण्याचा अधिकार मिळाला आहे.
“मुंबईतील अनेक मराठी कुटुंबे ४०० चौरस फुटांच्या घरातून १००० चौरस फुटांच्या घरात जात आहेत. त्यांचा आनंद पाहणे ही मोठी समाधानाची बाब आहे,” असेही त्यांनी सांगितले.
सहकारी संस्थांना ग्रामीण भागात विविध प्रकारची विकासकामे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (NCDC) माध्यमातून अर्थसाहाय्यही दिले जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
लोकाभिमुखता आणि सामान्य नागरिकांशी असलेली बांधिलकी ही सहकार क्षेत्राची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत त्यांनी व्यावसायिक आणि राष्ट्रीयीकृत बँकांनीही अशाच प्रकारची सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध संस्था, पदाधिकारी आणि मान्यवरांना ‘सहकार महर्षी’, ‘सहकार भूषण’, ‘सहकार रत्न’, ‘सहकार गौरव’, ‘महिला सहकार शक्ती’, ‘सहकार विभूषण’ यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर, विनय कोरे, चित्रा वाघ, रवींद्र चव्हाण यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.