सौजन्य- Team Navrashtra
जालना : जालना शहरातून एका 13 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा थरार समोर आला आहे. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि 11 तासांच्या शोधानंतर मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील 13 वर्षांचा श्रीहरी मुजमुले नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीत शिकतो. श्रीहरी सकाळी शाळेत जात असताना काही अज्ञातांनी त्याचे रस्त्यातच त्याचे अपहरण केले आणि दोन तासांनी त्यांच्या वडीलांना फोन करून तब्बल पाच कोटींची खंडणी मागितली. श्रीहरी जिवंत हवा असेल तर ५ कोटी तयार ठेव, पोलिसांना कळवलं तर मुलाला जीवे मारू, अशी धमकी दिली
या फोनमुळे श्रीहरीचे वडील कृष्णा चांगलेच घाबरून गेले. त्यांनी आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना फोन करून या अपहरणाबद्दल सांगितले. ही बातमी ऐकताच शेटेंनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोनवरून हा प्रकार सांगितला. फडणवीसांनीही या घटनेची गंभीर दखल घेत जालना पोलीस अधीक्षकांना तातडीने कामाला लागण्याच्या सुचना दिल्या.
देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनमुळे पोलीस यंत्रणांनी सुत्रे हलवली. जालन्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या शोधपथकाने श्रीहरीचा शोध सुरू केला. श्रीहरीच्या वडिलांना सतत अपहरणकर्त्यांचा फोन येत असल्याने पोलिसांना त्यांना ट्रेस करण्यात यश आले. पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि फोनच्यामाध्यमातून तपास सुरू केला
पाच कोटीं इतकी मोठी रक्कम देणे शक्य होणार नाही, २० लाख देतो अशी विनंती कृष्णा मुजमुले यांनी अपहरणकर्त्यांकडे केली. रात्रीच्या आठ वाजण्याच्या दरम्यान अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम घेऊन श्रीहरीच्या वडिलांना बोलवले होते. पोलिसांनी सापळा रचला. अपहरणकर्त्यांना सापळा रचल्याची माहिती मिळू नये आणि श्रीहरीच्या जिवाला धोका होऊ नये याची सर्व खबरदारीही घेण्यात आली.
रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान पैसे घेऊन मुलाचे वडील तिथे दाखल झाले. जालन्यातील एका रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी आरोपींची गाडी थांबली होती. दोघेजण गाडीतून उतरले आणि त्यांनी मुलाच्या वडिलांकडून पैशाची बॅग घेतली तर तिसरा श्रीहरीला घेऊन बसला होता. त्याच वेळी पोलिसांच्या एका पथकाने पैसे घेणाऱ्यांना पकडले तर दुसऱ्या पथकाने गाडीत बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. अशा रितीने श्रीहरीची सुखरूप सुटका करण्यात आली.