
विरारमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर फ्लॅट्सची विक्री ( सौजन्य - सोशल मीडिया )
नारंगी येथील सव्र्व्हे नं. २२५ (हिस्सा नं. ५ व ८) तसेच सर्व्हे नं. २३२ (हिस्सा नं. ५) या जागेवर ‘शिवशक्ती अपार्टमेंट’ (विंग ए, बी), ‘शिवशक्ती अपार्टमेंट-२’ (विंग ए, बी, सी) तसेच ‘ध्रुवी हाइट्स’ आणि ‘ध्रुवी हाइट्स ०२’ या इमारती या उभारण्यात आल्या आहेत. बांधकामांच्या परवानग्या बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनी विरार पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये गुन्हे दाखल केले होते. तरीही ही बांधकामे न थांबता पूर्णत्वास कशी गेली आणि त्यातील सदनिकांची विक्री कशी झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून मूळ डिजिटल अभिलेख सुरक्षित करावेत आणि दोषी विकासक, अधिकारी यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः बनावट बांधकाम परवानग्यांविरोधात गुन्हे दाखल केले असतानाही इमारती पूर्ण कशा झाल्या? महारेरा नोंदणी नसताना दस्तनोंदणी आणि सदनिकांची विक्री कशी झाली? सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्यभराची कमाई खर्च करून घरे घेतली आहेत. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.
माहितीच्या अधिकारात नगररचना विभागाने दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे की, संबंधित सव्हें क्रमांकांवरील बांधकाम परवानगी क्रमांकांची महापालिकेच्या संगणकीय प्रणालीत कोणतीही अधिकृत नोंद नाही. सहदुय्यम निबंधकांना अशा इमारतींची दस्तनोंदणी करू नये असे पत्र दिले असतानाही सदनिकांची दस्तनोंदणी व मालमत्ता कर आकारणी सर्रासपणे करण्यात आली. महारेराची सक्तीची नोंदणी नसतानाही सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची पुंजी लाटून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी करू नये, असे निर्देश असताना सहनिबंधक कार्यालयात सर्रासपणे दस्त नोंदणी केली जात असल्याचे अनेकदा उजेडात आले आहे.