
काही कार्यकत्यांच्या म्हणण्यानुसार नेतृत्वातील बदल हा पक्षाचा अंतर्गत निर्णय असला तरी स्थानिक पातळीवरील कार्यकत्यांना विश्वासात घेऊन तो झाला असता, तर निर्माण झालेला संभ्रम टाळता आला असता. दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेण्याची आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
माजी तालुकाध्यक्ष अशोक घोलप यांच्या कार्यकाळात नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला यश मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी अंबर परदेशी यांची नियुक्ती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, नव्या नेतृत्वालाही संघटना उभी करण्यासाठी संधी देण्याची भूमिका पक्षातील दुसरा गट मांडत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील काँग्रेसच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल झाले आहेत. काही युवा नेत्यांच्या भूमिकेमुळे आणि बदलत्या राजकीय घडामोडींमुळे संघटनेसमोर नव्या आव्हानांसह नव्या संधीही निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, विविध राजकीय प्रवाहांतील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा असून, पक्ष विस्तारासाठी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात असल्याचेही समजते. मात्र, संघटनेतील समन्वय राखत योग्य वेळी निर्णय घेतले जातील, असे पक्षातील सूत्रांकडून सागितले जाते.
जुन्नरसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात काँग्रेसला पुन्हा बळकट करायचे असेल, तर गटबाजीच्या चर्चाना पूर्णविराम देत जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे गरजेचे आहे. स्थानिक नेतृत्व, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते यांच्यात संवाद वाढल्यास आगामी निवडणुकांमध्ये पक्ष अधिक सक्षमपणे मैदानात उतरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सध्या कार्यकर्त्यांची प्रमुख अपेक्षा म्हणजे वरिष्ठ नेतृत्वाने जुन्नरमध्ये संघटनात्मक मेळावा घेऊन सर्व गटांशी संवाद साधावा, मतभेद दूर करावेत आणि आगामी निवडणुकांसाठी स्पष्ट दिशा द्यावी. पक्षाची ताकद ही कार्यकत्यांमध्ये असल्याने त्यांचा विश्वास जपणे हेच काँग्रेससमोरील सर्वात मोठे आव्हान आणि तितकीच मोठी संधी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.