
'स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे'; अजित डोवाल यांचा Gen-Z तरुणांना कानमंत्र; 'स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घ्या'
अजित डोवाल म्हणाले की, “आजच्या पिढीने स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे मनमानी किंवा काहीही करण्याचा अधिकार असा त्याचा अर्थ नाही. राष्ट्रहिताच्या विरोधात जाणारा कोणताही मार्ग स्वीकारता कामा नये.” त्यांनी प्रत्येक नागरिकाने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत भारताला अधिक सक्षम आणि शक्तिशाली बनविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
डोवाल यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. ते म्हणाले की, भारताला सध्या मजबूत नेतृत्व लाभले आहे. देश अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या सुरक्षाविषयक आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहे. भारताची वाढती प्रगती काही विरोधी शक्तींना खटकत असून अशा काळात प्रत्येक नागरिकाने राष्ट्रहितालाच सर्वोच्च स्थान दिले पाहिजे.
भाषणादरम्यान अजित डोवाल यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. शिक्षणाच्या काळात पुण्यातच लोकमान्य टिळकांचे विचार जवळून समजल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ब्रिटिश सत्तेच्या काळात लोक भीतीमुळे गप्प राहत असताना लोकमान्य टिळकांनी निर्भीडपणे आवाज उठवला. तुरुंगवास भोगूनही त्यांनी समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचा मार्ग सोडला नाही.
अजित डोवाल यांनी देशातील तरुणांना लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांचे संघर्ष आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श समोर ठेवून भारताच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, सक्षम, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी प्रत्येक युवकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.