पुणे: शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळांमधून गढूळ, कुजलेला आणि वास येणारे पाणी येत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळ्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. ठाकूर बेकरी परिसर, संत नामदेव हायस्कूल जवळचा भाग आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठामागील परिसरात ही समस्या अधिक तीव्र आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त नलिनी सुर्यवंशी यांनी सांगितले, “पाण्याबाबत तक्रारी मिळाल्या आहेत. संबंधित विभागाला तपासणीसाठी सांगितले असून लवकरच दुरुस्ती करून स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल.”
ऐन पावसाळ्यात तब्बल 1,300 टँकरने होतोय पाणीपुरवठा
मे आणि जून महिन्यांमध्ये समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटल्याचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात शहरात दररोज सरासरी 1300 टँकर फेऱ्या होत असल्याने महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा अपुरा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. धरणांत पाणी असूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू राहणे, हे महापालिकेच्या पाणी व्यवस्थापनातील अपयशाचे लक्षण आहे. समान पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण होण्याची गरज आहे. अन्यथा पावसाळ्यापर्यंत साठा असूनही उपनगरांतील नागरिकांना टँकरचा खर्च, गैरसोय आणि पाण्याची असुरक्षितता भोगावी लागणार आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मागणी कमी झाली, तर जूनमध्ये धरण भरले तरीही 39 हजारांहून अधिक टँकरच्या फेऱ्या झाल्या. गेल्या वर्षी याच तारखेला एकूण साठा फक्त 4.35 टीएमसी होता. म्हणजेच यंदा जवळपास चारपट अधिक जलसाठा उपलब्ध आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार धरणांत यंदा लक्षणीय साठा झाला आहे.
Pune Breaking: पुण्यात कोसळधार; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सध्याची स्थिती काय?
समान पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्ण
पुणे महापालिकेच्या वतीने शहरात समान पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. या योजनेतून संपूर्ण शहरात नियमित आणि समान प्रमाणात पाणी मिळावे, हा उद्देश आहे. मात्र या योजनेचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे अनेक उपनगरे व नवविकसित भागांमध्ये नागरिकांना अजूनही टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.