
काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण...; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेमुळे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ॲड आकाश विजयराव मोरे यांचा दाखल केलेला अर्ज अखेर मागे घेण्यात आला. मात्र २३ उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामती निवडणुकीतून काँग्रेसने अर्ज माघारी घेतला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सर्वांच्या विनंतीचा विचार करून अजित पवारांसाठी सहानुभूती म्हणून अर्ज माघारी घेतला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, असे असले तरी काँग्रेस पक्षाची भूमिका कायम आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा गुन्हा दाखल करावा यासाठी काँग्रेस पक्ष आजही आग्रही आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल केला नाही मात्र काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात गुन्हा दाखल केलेला आहे व त्याचा पाठपुरावा काँग्रेस करत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून लक्ष घालण्याची विनंती केली, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे आमदार रोहित पवार तातडीने बंगळुरूला गेले, त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी भेट घेऊन पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशीही अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी आम्ही चर्चा केली पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या एनसीपी पक्षातील मंत्री व नेते यावर काहीच बोलत नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सत्यशोधक चळवळीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे येथील महात्मा फुले वाड्याला भेट देवून अभिवादन केले. यावेळी सपकाळ म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, त्यांनी घालून दिलेली सामाजिक न्यायाची सांगड आजही अत्यंत महत्वाची आहे. महात्मा ज्योतीबा फुलेंचा विचार पुढे घेऊन जायची गरज आहे व काँग्रेस पक्ष त्याचा विचारातून वाटचाल करत आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.