
वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू; शेतकऱ्यांसाठी उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि अधिक उत्पादनक्षम इंद्रायणी भात बियाणे सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मावळ अॅग्रोच्या वतीने वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना थेट आणि प्रमाणित बियाणे मिळण्याचा मार्ग खुला झाला असून शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
वडगाव मावळ येथील राजमुद्रा फूड जंक्शन परिसरात जिल्हा बँकेच्या संचालकांच्या उपस्थितीत या वितरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकार महर्षी माऊली दाभाडे आणि तुकाराम ढोरे यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी दाभाडे, सहाय्यक निबंधक नवनाथ अलमट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास मालपोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मावळ अॅग्रोमार्फत शेतकऱ्यांसाठी इंद्रायणी भाताचे दोन प्रकारचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात ‘ब्रीडर बियाणे’ (मूळ बियाणे) आणि ‘प्रमाणित बियाणे’ या दोन प्रकारांचा समावेश आहे. अधिक उत्पादन क्षमता, उत्तम दर्जा आणि रोगप्रतिकारक क्षमता ही या बियाण्यांची वैशिष्ट्ये असल्याचे आयोजकांनी सांगितले. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे आणि विश्वासार्ह बियाणे मिळावे यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
यासोबतच शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी मावळ अॅग्रोने विशेष प्रयत्न केले आहेत. यापूर्वी व्यापाऱ्यांकडून भाताला प्रतिकिलो १६ ते १८ रुपये दर मिळत होता. मात्र मावळ अॅग्रोच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहिल्या वर्षी २६ रुपये, दुसऱ्या वर्षी २८ रुपये, तिसऱ्या वर्षी ३२ रुपये आणि चौथ्या वर्षी ३४ ते ३६ रुपये प्रतिकिलो असा दर मिळवून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच ब्रँडिंगद्वारे विक्री झालेल्या भाताला ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाल्याचे सांगण्यात आले. आगामी हंगामात याहून अधिक चांगला दर मिळवून देण्याचा मानसही संस्थेकडून व्यक्त करण्यात आला.
या वितरण केंद्रामुळे मावळातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, योग्य मार्गदर्शन आणि चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.