
भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर...; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
पुणे : भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर सत्तेतून बाहेर पडण्याचेही धाडस दाखवावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला लगावला आहे. भाजपच्या विरोधात जाणे सोपे नसताना सत्तेत राहून धाडस दाखवले असेल, तर त्याचे स्वागत आहे; मात्र पुढे काय होते, हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले. पेपरफुटीच्या प्रश्नावर प्राध्यापक, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.
एमपीएससी पेपरफुटी आणि परीक्षांमधील भ्रष्टाचारामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अधिकारी, अभियंता होण्यासाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याबाबत पवार म्हणाले, “त्या पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यांना कोणी भेटायचे हा त्यांचा प्रश्न आहे. प्रशांत किशोर यांना भेटण्यात दुसऱ्यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय?” भाजप नाराज होईल हे माहीत असतानाही भेट झाली असेल, तर ते धाडस आहे. मात्र प्रशांत किशोर यांना भेटणे महागात पडू शकते. चांगली गोष्ट स्वीकारण्यासाठी काही गोष्टी पचवाव्या लागतात, असे पवार यांनी सांगितले.
अर्थमंत्रिपद अजित पवार गटाला मिळणार का, या प्रश्नावर पवार म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा मुंबईत असताना त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट नाकारली असेल, तर एवढे महत्त्वाचे खाते मिळेल, असे वाटत नाही. अर्थखाते मिळाल्यास महत्त्वाच्या नाड्या हातात येतात, त्यामुळे भाजपला ते नको असावे, असा दावा त्यांनी केला. डिलिमिटेशनच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ खासदार मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदारसंघांची फेररचना ही प्रभाग फोडण्यासारखी झाली तर देशात लोकशाही राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी संसदेत घटनात्मक बदल करणे आवश्यक असून, केवळ आंदोलन किंवा राजकीय आश्वासनांनी आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे पवार म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समाजांत तेढ निर्माण करून भाजपने राजकीय फायदा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. तुकाराम मुंढे चांगले काम करत असले तरी केवळ एका अधिकाऱ्याला पुढे करून सरकारच्या इतर विभागांचे अपयश झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर सरकारकडून निर्णय करून घ्यायचे असतील तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
हे सुद्धा वाचा : सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई